Thursday, October 15, 2009

पाऊस कधीचा पडतो

दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप. परवाच्या दिवशीचा कोसळणारा पाऊस कार्यालयातील माझ्या खुराडात बसून (नुसताच) ऐकताना पदोपदी मला हेच 'च्यायला' माझ्याच आतून ऐकायला मिळत होते.

महिनाभरापूर्वीच भारतात असताना तिथला पाऊस अंगावर झेलला होता. खरे तर भाद्रपदातला पाऊस अंगावर घेणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे. त्यातून दौर्‍यातला प्रत्येक क्षण 'मंगऽलमूर्ती मोऽरया, गऽणपती बाप्पा मोऽरया' च्या जयघोषात बुडवून घेतलेला. तब्बल चार वर्षांनंतर ऐकलेले ते 'तत्तर तत्तर तत्तर तत्तर..' कानात साठवून घेताना पावसाकडे लक्ष कधी आणि कसे द्यावे?! नाही म्हणायला दोनदा शिवनेरीने मुंबई-पुणे केले तेव्हा घाटात त्याची नि माझी भेट झाली खरी; पण ती सुद्धा एका बंद काचेच्या अल्याड-पल्याडच्या अवस्थेत. एखादा कैदी नि त्याला भेटायला येणारे नातेवाईक जसे बंद गजांच्या अलीकडे-पलीकडे भेटावेत, अगदी तसे! किंवा अमेरिकन दूतावासात व्हिसाच्या रांगेत ताटकळल्यावर बुलेटप्रूफ काचेपल्याडच्या गोर्‍या अधिकार्‍याच्या प्रश्नांची इमानेइतबारे उत्तरे देण्यासाठी उभे रहावे, तसे! फरक इतकाच, की चार वर्षांपूर्वी मी मुंबईतला पाऊस मनात कैद करून घेऊन अमेरिकेत आलो होतो; नि या वर्षी मीच त्याच्याकडे त्याचाच कैदी म्हणून गेलो होतो. ते सुद्धा कोणत्याही व्हिसाशिवाय!

घाटातला पोपटीपिवळा रंग उतरणीला लागलेल्या पावसातही आपला ताजेपणा टिकवून होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यासारखा. खोपोली ते लोणावळा पट्ट्यामध्ये कोसळणारे दुधी धबधबे, कड्याकपारीमधून अचानक दिसणारे फेसाळते झरे मनातही कित्येक खळखळत्या आठवणी जागे करून जात होते. अशाच एका पावसाने कधी माझी आजी माझ्यापासून हिरावली होती; आणि त्याच वेळी नव्याने ओळख झालेल्या नि कालौघात सर्वोत्तम ठरलेल्या मित्रांशी गाठ घालून दिली होती. चार वर्षांपूर्वीच्या पावसाने मातृभूमी सोडताना असे काही रौद्र रूप दा़खवले होते की हाच पाऊस आपला इतका लाडका का आणि कसा असू शकतो, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी नवीकोरी पुस्तके नि दप्तरे घेऊन शाळेची धरलेली वाट, रेनकोटाची टोपी मुद्दामहून काढून भिजत घरी आल्यावर आईचा खाल्लेला मार, आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा, हवाहवासा वाटणारा एक चेहरा, निरोप देताना पाणावलेले आईवडिलांचे डोळे, मायभूमीतला चिखल, चौपाटी, ओल्या मातीचा वास, टपरीवरचा चहा आणि वडापाव, उद्यान गणेश च्या मागचा भजीपाव, मित्रमैत्रिणीसोबतचा भिजता टाइम् पास्, सॅन्डविच् नि कॉफी, सगळे डोळ्यांतल्या ढगांमागे सारून विमानात बसलो होतो. आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला.

पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान. तुमच्याआमच्यासारख्यांचे भावविश्व खुंटवणारी घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, लन्च टाइम्, जिम्, स्वयंपाक ही चौकट. पावसासोबत न जगता आल्याने झालेली एकटेपणाची जाणीव आणि पावसाशिवायच्या स्वयंसिद्ध जगण्याची मिजास. मग काहीतरी सुचते, लिहावेसे-बोलावेसे वाटते, कोणासोबत तरी बाहेर जाऊन चिंब भिजावेसे वाटते; वाटते घरी जाऊन दिवाणावर अंग टाकून हजारदा वाचलेले एखादे आवडते पुस्तक हातात घ्यावे, आवडती गझल लावावी आणि कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करावी; उगाचच दूरच्या मित्राला फोन लावून वाफाळत्या कॉफीचा कप हातात घेऊन तासन् तास गप्पा छाटाव्यात आणि ते सुद्धा पॅशिओचा दरवाजा सताड उघडा टाकून त्यालाही फोनवर तो पाऊस ऐकवत. वाटते जमेल तेव्हढा काळोख करून कोचावर पडावे आणि कोसळणारा पाऊस नुसता कानभर साठवून घ्यावा. बोलायचे, सांगायचे तर असते पुष्कळ पण..

.. पण आउटलुक मधला मीटिंग रिमाइन्डर् त्याच वेळी समोरच्या स्क्रीनवर कडमडतो. 'डिस्मिस्' म्हणावे की 'स्नूझ इन् फाइव् मिनट्स ' वर क्लिक् करावे या विचारापर्यंत पोचण्याच्या आतच हृदयाने नकळत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असतो - "च्यायला!"

Tuesday, April 07, 2009

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्‍या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्‍या किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्‍या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.
काही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत. चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्‍यांसाठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.
पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे! काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो. पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
आज भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.
=====================================================================================

प्रस्तुत लेखनातून निखळ करमणूक हाच एकमेव उद्देश आहे. जाणतेपणे कुणाच्याही धार्मिक, प्रादेशिक वगैरे प्रकारच्या भावना दुखावण्याचा दुष्ट हेतू मुळीच नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अजाणतेपणे कुणी दुखावेले गेले असेल, तर उदार मनाने हा लेखनापराध पोटात घालावा, ही कळकळीची नम्र विनंती
=====================================================================================

Thursday, September 27, 2007

... 'परी' हिच्यासम हीच!

"ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कराना गजब हो गया" हे अख्खं गाणं साधनासाठी चुकूनच लिहिलंय असं मला फार वर्षांपासून वाटत आलं आहे. फार वर्षांपासून म्हणजे, एक - जेव्हा हे गाणं ऐकलं-बघितलं तेव्हापासून, आणि दोन - साधना कोण आणि मधुबाला कोण हे कळायला लागल्यापासून. ज्या वयात मी माधुरीच्या 'एक-दोन-तीन' वर फिदा होऊन स्वतःला अनिल कपूर समजायला सुरुवात केली होती, त्यावेळी बबिता-नंदा, नर्गिस-मीनाकुमारी, साधना-वैजयंतीमाला या जोड्या माझ्यासाठी 'कन्फ्यूजन'चं जिवंत उदाहरण ठरायच्या. पण या सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण जाणवून द्यायची, ती एक आणि एकच - मधुबाला. मधुबालाच्या बाबतीत कधीच कन्फ्यूजन झालं नाही आणि तसं होण्याचा चान्सच नव्हता!

टपोरे पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे जिवंत, रसरशीत ओठ, जीव ओवाळून टाकावंसं खळखळणारं हसू, कपाळावर एकाच किंवा दोन्ही बाजूंना मिरवणारं बटेचं अर्धवर्तुळ आणि एकूणच टवटवीत व्यक्तिमत्त्वाच्या मधुबालाने कोणाच्याही मनात घर न केलं तरच नवल! मधुबालाला घडवल्यानंतर देवाने जगात सुंदर स्त्री निर्माण केलीच नाही, या माझ्या ठाम मताला अद्यापही तडा गेलेला नाही. बहुधा तिच्या जन्मानंतर देवानं तो साचाच मोडून टाकला असावा. काय योगायोग आहे पहा, मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारीचा (सन १९३३) - म्हणजे साक्षात व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशीच! या दिवशी एका गुडघ्यावर अर्धवट खाली बसून तिला साधं गुलाबाचं फूल देण्याचाही योग कुणाच्या नशिबात आल होता की नाही कोण जाणे; पण हिनं मात्र उण्यापुर्‍या छत्तीस वर्षांच्या अल्पायुष्यात करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवलं. वयाच्या तेराव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार्‍या मधुबालानं अशोककुमारबरोबर बॉम्बे टॉकिजच्या 'महल' (आयेगा, आयेगा, आयेगा...आयेगा आनेवला...आयेगा...) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दणदणीत पदार्पणाची वर्दी दिली आणि चाहते आणि चित्रपत्रकारिता विश्वाकडून 'वीनस ऑन द स्क्रीन'ची उपाधी मिळवली. अशोककुमारबरोबर 'हावडा ब्रिज', देव आनंद बरोबर 'काला पानी', किशोरकुमारबरोबर 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ तिकीट', भारतभूषण नावाच्या ठोकळ्याबरोबर (!! अरेरे!!) 'फागुन', 'गेटवे ऑफ इन्डिया' आणि 'बरसात की रात' हे तिचे लक्षात राहण्यासारखे काही चित्रपट. माझ्या तर ते एक से एक बढकर गाण्यांमुळे आणि त्यात दिसणार्‍या मधुबालेमुळेच लक्षात राहिलेत. हावडा ब्रिज मध्ये गोड हसून, मान वेळावून "आईयेए ए ए ए ए.......मेहेरबाँ" म्हणणारी मधुबाला कोण कशी विसरेल! चलती का नाम गाडी मध्ये "एक लडकी भिगी भागी सी" मधली साडीचा पदर पिळताना वैतागलेली आणि किशोरकुमारला करारी नजरेने खुन्नस देणारी, "पाँच रुपय्या बारा आना" मध्ये त्याच्याचबरोबर बागडणारी आणि निरागसपणे, अल्लडपणे त्याला "हाल कैसा है जनाब का" विचारणारी खट्याळ 'रेणू' कशी बरं लक्षात राहणार नाही?! गेटवे ऑफ इन्डिया मधली "दो घडी वो जो पास आ बैठे" म्हणणारी शांतस्वभावी, मंद हसणारी मधुबाला, काला पानी मध्ये "अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना" म्हणूण देव आनंदच्या नाकदुर्‍या काढणारी मधुबाला आठवणींच्या पडद्यावरून कशी पुसली जाईल? आणि तिच्या कारकिर्दीचा कळस ठरलेला 'मुघल-ए-आझम' - तो कसा विसरता येईल? "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" म्हणताना लाजून घूंघट उचलणारी पण त्याचबरोबर भर दरबारात षंढ सलीमला त्याच्या(च!) बापासमोर(च!) छातीठोकपणे "जब प्यार किया तो डरना क्या"विचारणारी अनारकली - विसरू शकू आपण तिला? मुळीच नाही!

या सौंदर्यदेवतेचं पडद्यामागचं आयुष्य मात्र बरंचसं इतरांसाठी जगण्यातच गेलं. आधी दिलीपकुमारची (आइच्यान!!!...दिलीपकुमार????? :( ) प्रेयसी म्हणून, मग किशोरकुमारची बायको म्हणून आणि सदान् कदा अताउल्ला खान या 'पठाणाची मुलगी' म्हणून. दिलीपकुमार आणि मधुबालाचा रोमान्स 'ज्वार भट्टा'च्या (सन १९४४) सेट्सवर चालू झाला, 'तराना' (१९५१) च्या वेळी भरात आला. 'नया दौर'च्या वेळेचे शूटिंगचे शेड्यूल दिलीपकुमारने आपल्या मुलीशी रोमान्स करण्यासाठी सोईचे असे बनवून घेतले आहे, या कारणास्तव अताउल्लासाहेबानं विरोध केला आणि मधुबालाची 'नया दौर' मधून हकालपट्टी होऊन वैजयंतीमाला त्यात आली. सायनिंग अमाउन्टच्या वादावरून निर्माते बी आर चोप्रा यांनी मधुबालाला कोर्टात खेचले आणि दिलीपकुमारने तिच्या व अताउल्लांच्या विरोधात शपथपत्र दिले. सहा वर्षांचा रोमान्स सहा मिनिटांपेक्षा कमी वेळात संपला. किशोरशी मात्र तिचा संसार तसा (बर्‍यापैकी) सुरळीत(च) पार पडला (किशोर अगदी रंगेल गडी असूनसुद्धा!) तिच्या हृदयाला भोक असल्याचे निदान होऊन ती लंडनला उपचारांसाठी गेली आणि तिकडून 'केवळ काही दिवसांचीच पाहुणी'चं सर्टिफिकेट घेऊनच आली. तरीही न खचून जाता तिने राज कपूर बरोबर सिनेसृष्टीत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. पण सततच्या आजारपणामुळे तो यशस्वी ठरला नाही. डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का देत लंडनहून आल्यावर मधुबाला ९ वर्षे जगली! ५० च्या दशकात तिच्या हॉलिवूडमधल्या पदार्पणाचेही प्रयत्न चालू झाले होते. 'थिऍटर आर्ट' सारख्या मासिकात तिच्यावर पानभर मोठ्या छायाचित्रासह एक लेखही छापून आला होता. पण तिचे हॉलिवूड पदार्पण तसेच राहून गेले. अन्यथा मर्लिन मन्रो वगैरेंसारख्यांना तिने टफ फाइट दिली असती, यात शंकाच नाही. २३ फेब्रुवारी १९६९ ला, आपला ३६ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर १० दिवसांत मुमताज बेगम जेहान् देह् लवी - अर्थात आपल्या लाडक्या मधुबालाने सगळ्यांचा कायमच निरोप घेतला. गंमत अशी की त्या काळात तिच्यावर जी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही किंवा अयशस्वी झाली, ती सध्या बरीच कॉमन समजली जाते.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला मधुबाला वेगवेगळ्या रूपांत दिसत आली आहे. अगदीच नकळत्या वयात मला ती नेहमीच परीकथांमधली पांढराशुभ्र फ्रॉक घातलेली, पाठीवर दोन पंख आणि हातात जादूची कांडी असलेली परी वाटायची. चलती का नाम गाडी मधली तिची खट्याळ, अल्लड, केसांना दोन रिबिनी बांधलेली निरागस रेणू कॉलेजात जाणार्‍या ताईसारखी वाटली. काला पानी मध्ये ती देवआनंदची प्रेयसी नाही, तर माझी स्वतःची गर्लफ्रेन्ड वाटली. तीच गोष्ट 'मिस्टर एन्ड मिसिज ५५' ची. आणि इतकी सालस आणि सोज्वळ की असे 'बायको मटिरिअल' आईपुढे उभे केले असते, तर तिने हसतहसत, आनंदाने होकार दिला असता ;) मधुबालानंतर माधुरी दिक्षित सोडून इतर कोणातही असा 'कुलीन गृहकर्तव्यदक्षपणा' सापडला नाही, आणि कदाचित सापडायचाही नाही. माधुरीचं मराठमोळेपण कोळणीची चोळी घालून "हमको आजकल है इन्तजार" वर नाचताना जितकं प्रसन्न आणि 'ऑब्विअस' आहे, तितकंच मधुबालाचं निर्मळ, शालीन असणं प्रसन्न आणि स्वाभाविक आहे. मराठमोळी मधुबाला पहायची असेल, तर परकर-पोलकं नेसून आणि काळ्या रिबिनी बांधून केसांच्या दोन वेण्या घातलेली 'नाच रे मोरा अंब्याच्या वनात'वर नाचणारी मधुबाला इमॅजन करा ;) म्हणजे मी काय म्हणतोय, ते ध्यानात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा ती माझ्या लेखनाची प्रेरणा ठरली आहे. भिंतीवरच्या तिच्या भल्यामोठ्या पोस्टरशी संवाद साधताना अस्वस्थ शब्दांना प्रसन्नतेकडे जाण्यासाठीचं तिकीट मधुबालानं फाडावं; तिला कुर्निसात करूनच शब्दन् शब्द कागदावर उतरावा, आणि भानावर यायच्या आत एखादी कविता किंवा गझल तिकडे अवतीर्ण व्हावी; केवळ शब्दांनाच नव्हे, तर मनालाही उभारी यावी, आणि या देवतेला मनोमन मानाचा मुजरा करून आपण एक 'फ्रेश' सुरुवात करायला घ्यावी, यापेक्षा अधिक समर्थ प्रेरणा दुसरी काय असेल? पडद्यावरचा तिचा सफाईदार वावर, कधी लडिवाळ, कधी करारी तर कधी धीरगंभीर, अश्रूपूर्ण डोळ्यांनी आणि कमनीय भिवयांनी बोललेले लाखो संवाद आणि गालावरच्या खळीतून उधळलेले आनंदाचे कित्येक क्षण कैक लोकांच्या आयुषातले हजारो सेकंद उजागर करून गेले असणार, यात शंकाच नाही. मधुबाला 'हॉट' नव्हती, सुंदर होती. शी वाज नॉट 'हॉर्नी', शी वाज ब्यूटिफुल. ती केवळ नावापुरती नाही, तर लौकिकार्थानं 'वीनस ऑन द स्क्रीन' होती, 'गॉडेस्' होती याबाबत दुमत नसावे. मधुबाला हे फक्त एक व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, वाद, गॉसिप्स, झगमगाट नाही; ते एक चिंतन आहे, समाधी आहे, असं मला वाटतं. आणि अशी समाधी लागली की मी नेहमीच म्हणतो -
दो घडी वो जो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे...

...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...


लेखातील चित्रपटविषयक व इतर माहितीपूर्ण संदर्भः विकिपिडिया
छायाचित्रांचे सौजन्यः गूगल इमेज सर्च

Friday, July 13, 2007

रॅट-अ-टुइ



आपल्याकडे संजीव कपूरच्या पुस्तकांमधून पाककृती वाचून नानाविध प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या यादीत रेमी नावाचा एखादा उंदीरसुद्धा सामील झाला, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? जास्त विचार करू नकात. तुमच्यासमोर हे कल्पनाविश्व 'रॅट-अ-टुइ' नावाच्या एका दे-धमाल चित्रपटातून वॉल्ट डिस्ने पिक्चर्स-पिक्सार यांच्या संयुक्त विद्यमाने उभे करण्यात आले आहे. अकादमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्रॅड बर्ड आणि 'कार्स','फ़ाइंडिंग निमो' सारख्या चलतचित्रपटांचे निर्माते पिक्सार ऍनिमेशन्स हे या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काअम करताना दिसणार आहेत.
गुस्तॉव्ह नावाच्या फ़्रान्समधील संजीव कपूरचे दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि त्याच्या पाककृतींचे पुस्तक यांवरून पदार्थ 'चवीने' खाण्यात आणि बनवण्यात रुची निर्माण झालेला रेमी नावाचा उंदीर पाकशास्त्राचा अभ्यास करतो. 'एनीवन कॅन कुक' हा गुस्तॉव्हचा मंत्र हा रेमीच्या आयुष्याचा मंत्र बनलाय. गुस्तॉव्हनेच रेमीला वेगवेगळ्या चवी 'शिकवल्या' आहेत. त्यामुळे समस्त उंदीर ज़मातीत रेमी एक क्रांतिकारी बनलाय. लाडका भाऊ एमिल आणि वडील, मित्रपरिवार यांच्याशी एका अपघाती विरहानंतर रेमी गुस्तॉव्हच्याच बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पूर्वप्रसिद्ध रेस्तराँ मध्ये शिरतो. पारंपारिक प्रसिद्ध खाद्यपदार्थांची वाट न चोखाळता चायनीज़, मेक्सिकन अशा पदार्थांतून रेस्तराँचा कायापालट करणाचे गुस्तॉव्हचा उज़वा हात असलेल्या स्किनरचे बेत दिवंगत गुस्तॉव्हचा मुलगा लिंग्विनीच्या अनपेक्षित आगमनामुळे उधळले ज़ाण्याच्या बेतात आहेत. आधी पोऱ्या म्हणून भटारखान्यात रुज़ू झालेला लिंग्विनी रेमीच्या करामतींमुळे कोणतेही पाककौशल्य नसतानाही एक अप्रतिम, चवदार सूप बनवतो आणि अल्पावधीतच एक कुशल आचारी म्हणून ओळखला ज़ाऊ लागतो. लिंग्विनीमुळे आपले बेत उधळले ज़ाणार असल्याची तसेच लिंग्विनीकडे कोणतेही पाककौशल्य नसून कोणाच्यातरी 'छुप्या' मदतीने निरनिराळे पदार्थ बनवले ज़ात आहेत, याची ज़ाणीव झाल्यावर स्किनरने या प्रकरणाचा छडा लावायचा निश्चय केलाय; ज्याने लिहिलेल्या प्रतिकूल समीक्षेच्या धक्क्याने गुस्तॉव्ह मरण पावला, तो एगो नामक पाकसमीक्षक लिंग्विनीवरही डोळा ठेवून आहे; एकीकडे भाऊ, वडील, मित्रपरिवार आणि दुसरीकडे गुस्तॉव्हचा मूलमंत्र आणि सदैव बरोबर असलेले त्याचे आभासी अस्तित्त्व (त्याला 'भूत' म्हणवत नाही) अशा द्विधा मन:स्थितीत रेमी सापडलाय; भटारखान्यातलीच एक उत्तम आचारी असलेल्या कॉलेटच्या प्रेमात लिंग्विनी अडकलाय, हे रेमीला कळलंय, त्याला ते प्रेम सफल व्हावंसं वाटतंय पण त्याला एगो आणि स्किनर दोघांशी भिडायचंयसुद्धा! तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही, इतक्या विविधांगी कल्पना आणि मानवी भावनांचे चित्रण रेमी, एमिल,लिंग्विनी,कॉलेट, स्किनर, एगो यांच्यापासून रेस्तराँमधील ग्राहक, भटारखान्यातील इतर कर्मचारीवर्ग, रस्त्यावरचे लोक, पशुपक्षी यासारख्या बारीकसारीक गोष्टी या सगळ्यांमधून करण्यात आले आहे. रेमी आणि लिंग्विनीची अपघातानेच झालेली मैत्री, रेमीच्या वडिलांचे त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न, एमिल आणि रेमीचे अपघाती पुनर्मिलन, स्किनरशी दुष्मनी, कॉलेट आणि लिंग्विनीचं प्रेम, रेमीने बाबांना ऐकवलेलं 'चेन्ज इज़ नेचर' हे वाक्य, समस्त उंदीरमित्रांनी स्किनरची खाद्यपदार्थांच्या गोदामात बांधलेली मुटकुळी हे सगळंच प्रेक्षणीय आणि कौतुकास्पद! मनापासून दाद देण्याज़ोगं! रेमीच्या साथीने आणि प्रमुख सहभागाने बनवलेली 'रॅट-अ-टुइ' खाऊन एगोला आठवलेली स्वत:च्या आईच्या हातची चव आणि त्याच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी हा चित्रपटाचा 'डिफ़ायनिंग सीन'!
भिवया आणि डोळ्यांच्या कल्पक हालचाली आणि त्यातून जिवंत झालेली पात्रं हे डिस्नेच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य या चित्रपटातही ठळकपणे ज़ाणवतं. आनंदित रेमी, रात्रीचे झगमगीत पॅरीस पाहून भारावलेला रेमी, घाबरलेला रेमी जितक्या कल्पकतेने रंगवलाय, तितक्याच कल्पकतेने त्याचे टवटवीत, उभारलेले कान गळपटवून आणि भिवया कपाळाच्या मध्यभागी एकवटवून 'तो निराश आहे' हे दाखवलंय. आळशी, बावळट लिंग्विनी, कॉलेटचे चुंबन घेऊन चक्रावलेला लिंग्विनी, 'टॉमबॉय' कॉलेट आणि लिंग्विनीवर रागावून मग रडणारी कॉलेट - एकूण एक पात्रे प्रेमात पडावीत अशी आहेत. चित्रपटाचा नायक रेमी हा तर टॉम ऍंन्ड जेरीमधल्या जेरीनंतर नंबर दोनचा 'क्यूट' उंदीर असावा; कदाचित मिकी माउसपेक्षाही जास्त. एक 'काहीच्या बाही', 'इमॅजन व्हॉटेवर' प्रकारची गोष्ट असली, तरीही तर्कसुसंगत आहे. कोठेही विस्कळीत झालेली नाही. 'लिंक तुटली' हा प्रकार कोठेही बघायला मिळत नाही. प्रसंगानुरूप श्रवणीय पार्श्वसंगीत आणि त्याला अनुकूल असा रंगीबेरंगी बॅकड्रॉप ही डिस्नेची खासियत प्रत्येक फ़्रेममधून ज़ाणवते. रंगसंगतीही प्रसंगानुरूप आणि भावानुरूप. पात्रांना त्यांचे वय, स्वभाव आणि कथानकातील भूमिका यांच्या अनुसारच आवाज़ देण्यात आले आहेत; आणि ते देताना फ़्रेंच उच्चारांकडे कटाक्षाने लक्ष पुरवण्यात आले आहे. अंधाऱ्या गोदामाचा दरवाज़ा उघडल्यानंतर आत येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग, त्यानुसार होणारी सावल्यांची हालचाल, विविध प्रकारच्या भाज्या ठराविक पद्धतीने कापण्याचे आचाऱ्यांचे कौशल्य हे बारकावेही अचूकपणे टिपण्यात आले आहेत. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स (आपण पात्राकडे/वस्तूकडे/दृश्याकडे वरच्या दिशेने तिरकस पाहत आहोत, असे मानून त्या वस्तू/पात्राचे/दृश्याचे केलेले चित्रण), 'ओवर द शोल्डर्स' शॉट्स (मुख्य पात्रावर एखाद्या दुय्यम वस्तू अगर पात्राच्या आडून केंद्रित केलेला कॅमेरा आणि टिपलेल्या हालचाली) अशा उत्कृष्ट चित्रणकौशल्याची ज़ोड मिळाल्यानंतर चित्रपट प्रेक्षणीय आणि खासम् खास झाला नाही तरच नवल. आणि चित्रपट आणखी छान करायचा म्हटला तर तो फ़ोर-डी करता येईल (तो 'छोटा चेतन' बघताना लावलेला काळा गॉगल म्हणजे थ्री-डी आणि त्याच्या ज़ोडीला तुमची सीट हादरवणारे, तिची उंची अलगद कमीजास्त करून नि कार्पेट सळसळवून किंवा तत्सम पद्धतीने तुम्ही स्वत: पडद्यावरील घटनांमध्ये सामील आहात, असा भास निर्माण करणे म्हणजे फ़ोर-डी) पण दोन-एक तासांच्या चित्रपटासाठी असे आभास निर्माण करणे आव्हानात्मक आणि कदाचित आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या, कथानकाच्या दृष्टिकोनातून 'फ़िज़ीबल' (मराठी प्रतिशब्द? नकोच!) नसावे.
भारतात हा चित्रपट आहे त्या स्वरूपात पहायला मिळाल्यास उत्तम! नाहीतर रेमीचे 'रामू' करून नि हास्यास्पद भाषांतरे करून उत्तम चित्रपटांना गालबोट लावण्याची परंपरा कायम राखली ज़ाण्याचीच शक्यता जास्त. मात्र असा उत्तम चित्रपट प्रत्येक लहान मुलापर्यंत सर्वदूर पोचवण्याचे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे चित्रपट वितरकांचे प्रामाणिक प्रयत्न असतील, तर निदान पात्रांच्या नावांशी आणि संवादांशी झालेली तडज़ोड सहन करण्याचीही तयारी ठेवणे श्रेयस्कर.
एकुणातच, लहानांबरोबरच मोठ्यांनीही मनमोकळेपणाने आनंद लुटावा, असा मस्त चित्रपट!

अधिक माहितीसाठी: रॅट-अ-टुइ

Tuesday, July 03, 2007

एका पदवीदान समारंभाची गोष्ट

मे २००५ मध्ये मला अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर ती काळी की गोरी हे सुद्धा पहायला मिळाले नव्हते. मुंबई विद्यापिठाचा पदवीदान समारंभ डिसेंबर २००५ मध्ये पार पडला आणि तेव्हा अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण २५% पूर्ण झाले होते. त्यामुळे काळा डगला, डोक्यावर ती चौकोनी टोपी आणि हातात पदवीचे भेंडोळे अशा अवतारातला फोटो काढून मिरवायची संधी कधी मिळते, याकडे लक्ष लागून राहिलेले. साधारण दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन 'मास्टर ऑफ़ कंप्यूटर सायन्स' ही पदवी मिळाली आणि ते स्वप्न साकार झाले. आईबाबांना समारंभाचे आमंत्रण पाठवून, त्यांचे व्हिज़ाचे सोपस्कार उरकून त्यांनी इकडे येण्यासाठी विमानात पाय ठेवेस्तोवर पदवीदान समारंभ अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यांचे तिकीट दोन वेळा बदलणे, प्रवासाची तयारी, औषधे या सगळ्यात मी अमेरिकेत असून आणि परीक्षा चालू असूनही अडकलोच होतो. आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास करून येण्याचा तणाव, लेकाच्या भेटीची तळमळ या सगळ्यात अनावश्यक सामानाचा व्यत्यय नको म्हणून त्यांची बॅगही मुंबई-पुणे प्रवासातल्या सामानासारखी भलतीच आटोपशीर झाली होती. आईबाबा येणार आणि आपले कौतुक करणार, शाबासकी देणार याची उत्सुकता लागून राहिली असल्याने तीन दिवसही खूप मोठा काळ वाटत होता. अमेरिकेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मातापित्याचे स्वागत करायला हा गडी साधारण दोन-एक तासांचा प्रवास करून डेट्रॉइटला ज़ायचा होता; पण ऐन वेळी खराब हवामानामुळे अस्मादिकांचे विमान त्यांच्या नंतर पोचले आणि मी माझ्या आईबाबांचे स्वागत करण्याऐवजी त्यांनीच माझे स्वागत केले. मीराताईंच्या चिरंजिवांच्या पदवीदान समारंभाबाबतचे लेखन वाचल्यानंतर तर खराब हवामान आणि पदवीदान यांचे जन्मजात वैर असावे, असेच वाटून गेले. विमानात मिळालेली काळीकुट्ट, दूध-साखर नसलेली कॉफ़ी आणि एका मुज़ोर हवाईसुंदरीबद्दलची तक्रारसुद्धा आई ज्या कौतुकाने सांगत होती, ते पाहिल्यावर माझ्या उच्च शिक्षणाचे आणि तिच्या डोळ्यांत तरळलेल्या आनंदाश्रूंचे चीज़ झाल्याचे वाटले.
डेट्रॉइटला माझ्या मावसबहिणीकडे दोन दिवस घालवून आम्ही आमच्या गावी समारंभाच्या आदल्या दिवशी परतलो. आईबाबांच्या लग्नाचा आणि आईचा असे लागोपाठच्या दिवशीचे दोन्ही वाढदिवस त्यांना विमानात झोपा काढून साज़रे करायला लागल्याने आम्ही डेट्रॉइटलाच एक छोटीशी पार्टी उरकून घेतली. पदवीदान समारंभाच्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने आईबाबाच तयार होत होते. बाबांचा कडक इस्त्रीचा सफारी, आईची शिफ़ॉन साडी आणि मॅचिंग ब्लाउज़ आधीच ठरले असल्याने त्यांना तयार व्हायला मुळीच वेळ लागला नाही. मात्र कोणता शर्ट, कोणता टाय हे ठरवताना मात्र माझी बरीच पर्म्युटेशन्स-कॉंबिनेशन्स चालू होती. अखेर मनासारखा नट्टापट्टा झाल्यावर आम्ही घरून निघालो तेव्हा पदवीदान समारंभ अवघ्या १५ मिनिटांवर येऊन ठेपला होता. आईबाबांबरोबरच सुपरिचित मनोगती विनायककाका आणि रोहिणीकाकू, माझे मित्रमैत्रिणी, खोलीमित्र (रूममेटस) आमच्याबरोबर. त्यातच माझे दोन रूममेटसही माझ्याबरोबर ग्रॅज्युएट होणार आणि त्यातल्या एकाचे कुटंब त्याच्याबरोबर. एकूणच मोठा लवाज़मा होता.
संपूर्ण विद्यापिठाचा पदवीदान समारंभ खूप मोठा, धडाकेबाज़ काहीसा नखरेल पण तरीही हवाहवासा. प्रॉव्हिडन्स बॅप्टिस्ट चर्चमध्ये झालेला आमच्या संगणकशास्त्र विभागाचा पदवीदान समारंभ मात्र सुनियोजित आणि आटोपशीर. मोज़की पण मोलाची भाषणे, विचारांची देवाणघेवाण आणि मग पदव्या प्रदान करण्याचा सोहळा आटोपून बाहेर पडेस्तोवर साधारण तीन तास उलटून गेले होते. छायाचित्रे काढणे, मास्तरांना भेटणे, आईबाबांच्या सगळ्यांशी औपचारीक ओळखी, गप्पाटप्पा, हास्यविनोद यांत पोटात कावळे ओरडायला लागल्याची ज़ाणीव झाली नव्हती; पण 'बिर्याणी हाउस'च्या दारातून आत शिरल्यावर मात्र गप्पांपेक्षा अधिक - खाण्यासाठी - तोंड चालू लागले. जेवण आटोपून आणि नंतरच्या गावजेवणासाठीची आवश्यक खरेदी करून घरी गेलो तेव्हा संध्याकाळचे सात वाज़ून गेले होते. विनायककाका आणि रोहिणीकाकूंना त्यांच्या गावी वेळेत पोचणे आवश्यक असल्याने गरमागरम चहा झाल्यावर त्यांनी आमचा निरोप घेतला. रात्रीच्या जेवणासाठी त्यांना थांबता आले असते तर काकूंच्या हातची कोणती डिश चाखायला मिळाली असती, हे स्वप्नरंजन मी आज़ही अधूनमधून करत असतो
अमेरिकेतील विद्यार्थी समुदायामध्ये आपल्यातल्याच कोणाचीतरी आई आल्याचा आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असतो. आणि त्या आनंदाचा चवदार मोठेपणा हा दरदिवशी एक पदार्थ या हिशेबाने साठ-एक बटाटेवडे, तितक्याच इडल्या, चार किलो चिकन, कोलंबीभात आणि सोलकढी, पावभाजी, झुणकाभाकर नि चटणी, पराठे, थालिपिठे, पोहे नि उपमा, छोले/मटार उसळ, नानाविध भाज्या आणि मुख्य म्हणजे गरमागरम, तूप लावलेल्या पोळ्या यांच्या डिशच्या डिश काही मिनिटातच संपायला लागल्या की ठळकपणे ज़ाणवतो. एरव्ही अमेरिकेत असताना पोळी-भाजी, आमटीभात आणि बाज़ूला आंबा किंवा मिरचीचे लोणचे, पापड/तळलेली मिरची/सांडगे किंवा कोशिंबीर यांपैकी काहीतरी असा चौरस आहार दिवसातून दोन वेळा सोडाच पण दोन महिन्यांतून एकदा मिळण्याचेही सुख नाही फक्त काही दिवसच मिळालेल्या या सुखाने आम्हां सगळ्यांचे आमच्याआमच्या 'लोडशेडिंग'चे बेत एकहाती उधळून लावले; पण त्या पंधरा-सोळा मुखांनी प्रत्येक डिश चाटूनपुसून खाताना दिलेला ढेकररूपी दुवा ही माझ्या आईबाबांसाठी पुत्रविरहावरची दवा ठरणार यात मुळीच शंका नाही. आमेन!!!

समारंभाची छायाचित्रे येथे पाहता येतील.

Wednesday, April 04, 2007

शब्दसाधना

मनोगत या संकेतस्थळावर श्री. द्वारकानाथ कलंत्री यांनी शब्दसाधना नावाचा एक चांगला प्रयोग चालवला आहे. व्यवहारातील, शास्त्रीय शिक्षणातील अनेक प्रचलित बिगर-मराठी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द शोधणे/तयार करणे असे या प्रयोगाचे स्वरूप आहे. प्रस्तुत शब्दसाधना एक 'प्रयोग' म्हणून निश्चितच स्तुत्य आहे. प्रयोगातून काय साध्य होणार आहे, माहीत नाही. पण 'करून पहायला काय हरकत आहे' या भूमिकेतून करण्यास हरकत नसावी. एडिसनच्या बाबतीत असे ऐकले आहे की फ़िलामेंट म्हणून १२०० विविध वस्तू अयशस्वीपणे वापरून झाल्यानंतर तो म्हणाला की "या १२०० वस्तू फ़िलामेंट म्हणून वापरता येणार नाही, हे तरी मी आता १००% खात्रीने सांगू शकतो". शब्दसाधनेचेही असेच काहीसे असावे असे वाटते. मुद्दा हा आहे, की एडिसनकडे १२०० वस्तू वापरण्याइतकी चिकाटी होती, ती या प्रयोगात असावी. प्रयोगाअंती ज़े गवसेल, त्याचा उपयोग काय आणि/किंवा कसा, ही चर्चा काहीतरी गवसल्यानंतरच करता येईल. प्रस्तुत प्रयोगामागील प्रयोगशीलता, जिज्ञासू वृत्ती आणि धडपड याला सक्रीय पाठिंबा द्यायला निश्चितच आवडेल.
प्रयोगाच्या संभाव्य निकालांचा किंवा त्याच्या अधिक्षेत्राचा सखोल विचार केल्यावर, शास्त्रीय लेखन, संशोधन आणि अभ्यास या क्षेत्राकडून या प्रयोगाला तसेच त्याच्या निकालाला मिळणारी मान्यता याबाबत मी पूर्णपणे साशंक आहे. नवनवीन आणि कदाचित शुद्ध मराठी शब्दांमुळे प्रचलित सोप्या आणि कदाचित अमराठी शब्दांद्वारे चालू असलेल्या अभ्यासाला,संशोधनाला प्राप्त होणारे अतिक्लिष्ट रूप निश्चितच मान्यताप्राप्त आणि उपयुक्त नाही. ऑपरेटिंग सिस्टमचा अभ्यास करताना थ्रेडसना 'धागा', प्रोसेसेसना 'प्रक्रिया' असे संभाव्य शब्द योजणे (मराठीच्या दुराग्रहापायी हे आणि असे शब्द इतरत्र पाहण्यात आले आहेत) हे त्यांच्यातला 'शास्त्रीय'पणा किंवा त्यांमागे दडलेला शास्त्रीय अर्थ यांसाठी निश्चितच मारक आहे. त्यातून ज़वळपास सारखेच भासणारे शास्त्रीय शब्द त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे शास्त्रीय संदर्भांत वेगळे असतात. ही सूक्ष्म अर्थभिन्नता (subtle differences) पर्यायी मराठी शब्दांच्या माध्यमातून समाविष्ट केली ज़ाईलच असे नाही. उदाहरणार्थ डेटाबेस आणि डेटा वेअरहाउस. डेटाबेस म्हणजे विदागार. मग डेटा वेअरहाउस म्हणजे काय? डेटाबेस क्रॅश झाला म्हणजे विदागार कोसळले. पण 'कोसळणे' या क्रियापदाला अपेक्षित असलेला 'डोलारा', 'उत्तुंग बहुमज़ली इमारत', आशाअपेक्षा, स्वप्नांचे बंगले यांपैकी त्या बिचाऱ्या विदागारात काहीच नाही. त्यातून शास्त्रीय संशोधन हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच अर्यादित नाही; ते जगभर चालू असते. शास्त्रीय ज्ञानाची वैश्विक देवाणघेवाण होत असते. उद्या अशाच एका जागतिक परिसंवादात अमेरिकन, चिनी, जपानी, युरोपीय संशोधकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना डेटाबेससाठी 'विदागार'चा हट्ट धरणे यात काही समंजसपणा दिसत नाही. शास्त्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात तरी शब्दसाधनेच्या संभाव्य निकालांचा आवाका इयत्ता दहावीच्य पठ्यपुस्तकांच्या पुढे ज़ाईलसे दिसत नाही, आणि तसा ज़ाऊही नये! मूलभूत शास्त्रीय शिक्षणातून अशा योग्य शब्दांची ओळख होणे स्पृहणीय आहे, पण या पायाभूत शिक्षणाद्वारे एकदा उच्च शिक्षणाचे दरवाज़े खुले खाले, की मराठमोळ्या शास्त्रीय शब्दांचे महत्त्व 'अँटिक पीस'पेक्षा फार वेगळे असेल, असे मला वाटत नाही. विमान आकाशात उडवायलाच आणि उडायला लागेपर्यंतच लाँचपॅड आवश्यक असते ऍट्रिअम आणि व्हेंट्रिकलसाठी अलिंद आणि नीलय माहीत असावे; पण माहीतच असावे.
प्रादेशिक संपर्क आणि प्रसार माध्यमे, दृक् श्राव्य माध्यमे (ज़से बातम्या इ.), व्यासपिठावरील मराठी या क्षेत्रांमध्ये शब्दसाधनेच्या माध्यमातून अपेक्षित सुधारणा निश्चितच घडवता येतील. मात्र चित्रपट, मालिका इत्यादींमध्ये - जे साहित्यिक किंवा लिखित मराठीपेक्षा दैनंदिन जीवन, व्यापारउदीम, शास्त्रीय/राजकीय/सर्वसामान्य आणि सर्वमान्य सामाजिक कल्पना यांचे प्रतिबिंब आहेत; ज्यातून 'बोलले' ज़ाते, संवाद साधला ज़ातो - या साधनेच्या निकालाबरहुकूम नवीन (योग्य?) शब्दांचा भरणा झाला, तर त्याला मान्यता मिळणे नाही. साधेसोपे शब्द सापडले, ते ज़र सद्य शब्दांची क्लिष्टता कमी करत असतील, तरच त्यांना मान्यता मिळावी. पण बोली मराठी, शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रामधील डेटाबेससारख्या शब्दांमधला सोपेपणा विदागारसारख्या शब्दांतून आणखी सुधारेल, असे म्हणणे मला पटत नाही. किंबहुना त्यामुळे क्लिष्टता वाढते. उद्या माझ्या बंगाली मैत्रिणीला 'चल चित्रपट देखने जाते है' म्हटले (चित्रपट हा हिंदी शब्दही आहे आणि आम्हा दोघांची संवाद साधण्याची सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी आहे, हे गृहीत धरून), तर संपलेच! भिन्न संस्कृती, भाषा, आचारविचार यांची सरमिसळ आपल्याच समृद्धीसाठी उपयुक्त ठरत असेल, तर आपलेच पाय ओढण्याचा पारंपारीक मराठी बाणा काय कामाचा? मराठी भाषा प्राचीन काळापासून आज़तागायत कित्येक अमराठी शब्दांच्या समावेशातूनही समृद्धच होत आली आहे, आणि राहीलही. त्यामुळे अमराठी शब्दांच्या समावेशातून तिच्या अस्तित्त्वाबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्याचबरोबर शब्दसाधनेच्या प्रयोगाला तात्त्विक विरोध असणाऱ्यांच्या मराठिविषयीच्या प्रेमाबाबत शंका घेण्याचेही कारण नाही. इंग्रज़ाळलेली व्यापारी मराठी वर्तमानपत्रे, बातमीपत्रे, सरकारी दप्तरे, लिखित साहित्य इत्यादींमधील अपेक्षित सुधारणा हे या साधेनेचे उद्दिष्ट असलेच पाहिज़े, त्याबाबत हट्ट ज़रूर असावा; पण दैनंदिन व्यवहार आणि शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रांमध्ये अशा शब्दांचा प्रवेश ही घुसखोरी किंवा अतिक्रमण ठरू शकेल आणि हट्टाला दुराग्रहाचे किंवा अतिरेकाचे स्वरूप प्राप्त होईल, ज़े निश्चितच अपेक्षित नसावे. प्रयोगाचे अपेक्षित अधिक्षेत्र निश्चित करून ही धडपड पुढे रेटली, तर उत्तम!
तेव्हा हा प्रयोग यापुढे या निश्चित मर्यादित उद्दिष्टांसह पुढे नेल्यास आनंद होईल. शब्दसधनेत याआधीही काही वेळा सहभागी होतो, पुढेही राहीन. पण त्याचबरोबर मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही.

Monday, April 02, 2007

मैंने प्यार किया - सुरुवात

प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनाऱ्यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं. वह्यापुस्तकांतून 'आज़ कुठे कधी भेटायचं' ठरवणाऱ्या चिठ्ठ्या पास करणं हे प्रेम असतं; दूधवाला, किराणा सामान, डॉक्टर, इलेक्ट्रिसिटी यांची बिलं त्या त्या पाकिटात भरून ठेवताना चुकणारे हिशेब आणि त्यावरून ऐकू येणारे 'तू म्हणजे ना डोक्याला ताप आहेस नुसता/ती!', हे प्रेम असतं; आणि ज्या भावलीसाठी आजीकडून स्वेटर विणून घेतला, तिच्या डाव्या डोळ्याच्या ज़ागी दिसत असणारं नुसतंच भोक आणि डोक्यावरचे तुरळक केस यांची पर्वा न करता तिला कुशीत घेऊन झोपणं, हे सुद्धा प्रेमच असतं. इतकं विविधांगी प्रेम कसं बरं सेम असू शकेल? मी प्रेम केलंय ते अशा सेम नसलेल्या प्रेमावर.
प्रेम ही संकल्पना, किंवा तिचा आपण लावत असलेला अर्थ, या दोन गोष्टी एकत्र किंवा आळीपाळीने स्थलकालपरत्त्वेच नव्हे तर वयपरत्त्वेही बदलत असतात, असं माझं ठाम मत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडलो, तेव्हा भातुकली खेळणाऱ्या माझ्या बालमैत्रिणीच्या प्रेमात पडलो होतो; भातुकली खेळताना ती ज्या रिअल लाइफ़ 'सांसारीक' सिच्युएशन्स तयार करायची, त्यांच्या प्रेमात पडलो होतो; की भातुकलीसाठी तिच्या घरून मिळणाऱ्या 'पेप्पी' आणि 'अंकल चिप्स'च्या प्रेमात पडलो होतो, हे सांगणं कठीण आहे. आमच्याच काही मित्रमैत्रिणींची त्या 'अंकल चिप्स'सारखीच कुरकुरीत प्रेमं (प्रेम या शब्दाचं अनेकवचन काय आहे हो?) आम्ही आज़ही एन्जॉय करतो. तेव्हा आम्हा दोघांची एक प्रतिक्रिया नेहमीच असते - "आपलं 'लफ़डं' कधी झालंच नाही!" पोरं कसली दिवटी आहेत, याची ज़ाणीव आमच्याआमच्या आईबाबांना वेळीच झाल्याने भातुकलीमधले आमचे 'आई-बाबा' हे रोल्स 'ताई-दादा' मध्ये बदलणे, हे असं लफ़डं न होण्याचं कारण असावं. लफ़डं हे 'प्रेम इन इटसेल्फ़' आहे, असं मला नेहमीच वाटत आलंय. प्रेमाची खुमारी लफ़ड्यात अनुभवायला मिळण्याचं भाग्य फार कमीज़णांच्या नशिबात असतं. तुमचंआमचं लफ़डं सलमान-कतरीनाच्या लफ़ड्यासारखं स्टारडस्ट किंवा चित्रलेखाच्या मुखपृष्ठावर झळकणारं, झगझगीत नसलं तरी किमान आईबाबांपासून चोरून ठेवण्यासारखं, मित्रमैत्रिणींच्या कौतुकाचा आणि वाती वळताना साठेमामींच्या जिव्हाळ्याचा विषय ठरू शकणारं नक्कीच असतं. मराठीच्या पुस्तकातली बालकवींची 'पारवा' तोंडी परीक्षेला आहे, हे माहीत असूनही पाठ नसते, आणि करताही येत नाही. पण परदेसमधलं 'दो दिल मिल रहे हैं' अथपासून इतिपर्यंत मुखोद्गत व्हायला अजिबात कष्ट पडत नाहीत. क्लास बंक करून प्लाझाला पिक्चर बघायचा. मग बिल्डिंगखाली आल्यावर आधी वर कोणी ज़ायचं आणि मग अर्ध्या तासाने कोणी ज़ायचं याचं प्लानिंग करायचं. झालंच तर गणपतीच्या मखराची सज़ावट करताना, तिची किंवा त्याची आयडिया कितीही आवडली, तरी मुळीच पाठिंबा न देता इतरांवर त्याचा निर्णय सोपवून, 'मी डावा गाल खाज़वला म्हणजे मला तुझी आयडिया आवडली', हे प्लान करायचं. किती ही सृजनशीलता! प्रेमात पडल्यावर काय काय पापड लाटावे लागतात, हे त्या बिचाऱ्या प्रेमवीरांनाच ठाऊक असतं. आणि त्यांच्या या धाडसाला 'लफ़डं' म्हणून सारी दुनिया या प्रेमाला एक नकारात्मक छटा देऊन टाकते. अशा कित्येक लफ़ड्यांवर मी मनापासून प्रेम केलंय - स्वत:ची नसली तरी!
'बाज़ारात दालचावलचे भाव काय आहेत', किंवा 'प्रेम कशाशी खातात कळतं का तुला' वगैरे घिसेपिटे प्रश्न प्रेमात तहानभूक हरवलेल्यांना कसे हो पडणार? आपल्या जानेमनला शाहरूख 'जाम म्हणजे जाम' इतका (कदाचित आपल्यापेक्षाही जास्त!) आवडतो, हे माहीत असलं की 'कुछ कुछ होता है' बघताना तिकिटावर किती उडाले की उडवले, याचा विचार करायचा नाही, हे त्यांना कळतं. त्याचबरोबर जिप्सीतली पावभाजी या महिन्याच्या उरलेल्या पॉकेटमनीत बसणार नाही, हे सुद्धा त्यांना नक्कीच माहीत असतं. त्याला आवडतो म्हणून मी माझा मोरपिशी पंजाबी घालायचा नि त्यावर काळी ओढणी घ्यायची; आणि तिला आवडत नाही म्हणून मी पर्पल लूज़र घालायचा नाही, हे त्यांना कळतं. पहिल्या मज़ल्यावरून ती बघते आहे म्हणून चौकात क्रिकेट खेळताना आपली विकेट ज़ाऊ द्यायची नाही हा त्याचा निर्धार असतो - बॉल मांड्यांवर ज़बरी शेकत असला तरी! आणि वर्गात बसून असाइनमेंट पूर्ण करत असला, तरी त्याचं लक्ष नाटकाच्या तालमीत आहे, हे माहीत असल्याने डायलॉग विसरायचा नाही, याकडे तीही कटाक्षाने लक्ष देते. शाळाकॉलेजातून बाहेर पडल्यावर नोकऱ्या केल्या, गाठीशी चार पैसे ज़मायला लागले, आणि घरच्यांनी स्थळं बघायला सुरुवात केली, की घरी सांगायचं हा बेत तर कितीतरी आधीपासून तयार असतो. नव्या ज़मान्यातले साहित्यविश्वातले कित्येक अनामिक कवी हे प्रेमाचीच देणगी आहेत. चार ओळी असोत किंवा चाळीस; छंदात असो वा नसो, गझल असो की मुक्तक की चारोळी; पण ते कविता करतात आणि स्वतःला व्यक्त करतात. सुरात गाता येत नसलं तरीही ऑर्केस्ट्रा ऑडिशन्ससाठी किंवा अभिनयाचं अंग नसतानाही नाटकासाठी नाव देतात. असं अचूक प्लानिंग, असंख्य तडज़ोडी शिकवणारं प्रेम, काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःचं वेगळं अस्तित्त्व निर्माण करण्याची ऊर्मी ज़ागवणारं प्रेम, असंख्य कवितांमधून व्यक्त होणारं प्रेम - या प्रेमावर मी प्रेम केलंय. डाळतांदळाचे भाव आणि गझलेचं व्याकरण माहीत असूनही!
कधीकधी नकोसं वाटतं असं प्रेम करणं. जेव्हा कुणी अमृता देशपांडे, रिंकू पाटील जिवंत ज़ाळली ज़ाते. जेव्हा आपण हृतिक रोशनसारखे दिसत नाही किंवा आपल्याकडे होंडा सिविक नाही, हे कोणालातरी कळतं. आमच्या वयात वर्षाचं अंतर आहे; ती जैन आहे, मी कोकणस्थ चित्पावन आहे आणि आम्ही पुढे गेलोच तर नक्की कोणालातरी हार्ट ऍटॅक येणार, याची ज़ाणीव होते. तिचे बाबा लार्सन ऍंड टूब्रोमध्ये जी एम आहेत आणि माझे बाबा मंत्रालयात हेडक्लार्क, हे लक्षात येतं. आधीचं गुलाबी लफ़डं नुसतं लफ़डं राहत नाही, तर त्याचं 'सॉलिड प्रकरण' बनतं, कधीकधी दारावर पोलीसही येतात. मोरपिशी पंजाबी घालावासा वाटत नाही की जिप्सीत ज़ावंसंही वाटत नाही. क्रिकेट खेळताना क्लीन बोल्ड होऊनही फरक पडत नाही. मग एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करत प्रेमवीर आपापल्या रस्त्याने चालू पडतात. पण प्रेमाची अनुभूती घेऊन आणि त्या अनुषंगाने मिळणारे 'लाइफ़ मॅनेजमेंट'चे धडे घेऊनच.
इतक्या गहन आणि सर्वांगसुंदर विषयावर सर्वसमावेशक धडी देणारा मी कोणी 'लव्ह गुरु' नाही. पण ढोबळमानाने या प्रेमाचे अनेक प्रकार आणि स्वतःला तसेच इतरांना आलेले अनुभव, प्रेमातल्या टिप्स आणि पिटफ़ॉल्सचं प्रामाणिक चित्रण या मालिकेद्वारे करण्याचा प्रयत्न आहे. अनुभवी प्रेमवीरांना यात स्वतःला हुडकता आले, तर आनंदच आहे. आणि होतकरू प्रेमवीरांसाठी ही मालिका अगदी नवनीत गाईड नाही, पण किमान क्विक रेफ़रन्स पॉकेट डिक्शनरी स्वरूपातले मार्गदर्शक ठरले, तरी खूप आहे!