Thursday, October 15, 2009

पाऊस कधीचा पडतो

दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप. परवाच्या दिवशीचा कोसळणारा पाऊस कार्यालयातील माझ्या खुराडात बसून (नुसताच) ऐकताना पदोपदी मला हेच 'च्यायला' माझ्याच आतून ऐकायला मिळत होते.

महिनाभरापूर्वीच भारतात असताना तिथला पाऊस अंगावर झेलला होता. खरे तर भाद्रपदातला पाऊस अंगावर घेणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे. त्यातून दौर्‍यातला प्रत्येक क्षण 'मंगऽलमूर्ती मोऽरया, गऽणपती बाप्पा मोऽरया' च्या जयघोषात बुडवून घेतलेला. तब्बल चार वर्षांनंतर ऐकलेले ते 'तत्तर तत्तर तत्तर तत्तर..' कानात साठवून घेताना पावसाकडे लक्ष कधी आणि कसे द्यावे?! नाही म्हणायला दोनदा शिवनेरीने मुंबई-पुणे केले तेव्हा घाटात त्याची नि माझी भेट झाली खरी; पण ती सुद्धा एका बंद काचेच्या अल्याड-पल्याडच्या अवस्थेत. एखादा कैदी नि त्याला भेटायला येणारे नातेवाईक जसे बंद गजांच्या अलीकडे-पलीकडे भेटावेत, अगदी तसे! किंवा अमेरिकन दूतावासात व्हिसाच्या रांगेत ताटकळल्यावर बुलेटप्रूफ काचेपल्याडच्या गोर्‍या अधिकार्‍याच्या प्रश्नांची इमानेइतबारे उत्तरे देण्यासाठी उभे रहावे, तसे! फरक इतकाच, की चार वर्षांपूर्वी मी मुंबईतला पाऊस मनात कैद करून घेऊन अमेरिकेत आलो होतो; नि या वर्षी मीच त्याच्याकडे त्याचाच कैदी म्हणून गेलो होतो. ते सुद्धा कोणत्याही व्हिसाशिवाय!

घाटातला पोपटीपिवळा रंग उतरणीला लागलेल्या पावसातही आपला ताजेपणा टिकवून होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यासारखा. खोपोली ते लोणावळा पट्ट्यामध्ये कोसळणारे दुधी धबधबे, कड्याकपारीमधून अचानक दिसणारे फेसाळते झरे मनातही कित्येक खळखळत्या आठवणी जागे करून जात होते. अशाच एका पावसाने कधी माझी आजी माझ्यापासून हिरावली होती; आणि त्याच वेळी नव्याने ओळख झालेल्या नि कालौघात सर्वोत्तम ठरलेल्या मित्रांशी गाठ घालून दिली होती. चार वर्षांपूर्वीच्या पावसाने मातृभूमी सोडताना असे काही रौद्र रूप दा़खवले होते की हाच पाऊस आपला इतका लाडका का आणि कसा असू शकतो, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी नवीकोरी पुस्तके नि दप्तरे घेऊन शाळेची धरलेली वाट, रेनकोटाची टोपी मुद्दामहून काढून भिजत घरी आल्यावर आईचा खाल्लेला मार, आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा, हवाहवासा वाटणारा एक चेहरा, निरोप देताना पाणावलेले आईवडिलांचे डोळे, मायभूमीतला चिखल, चौपाटी, ओल्या मातीचा वास, टपरीवरचा चहा आणि वडापाव, उद्यान गणेश च्या मागचा भजीपाव, मित्रमैत्रिणीसोबतचा भिजता टाइम् पास्, सॅन्डविच् नि कॉफी, सगळे डोळ्यांतल्या ढगांमागे सारून विमानात बसलो होतो. आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला.

पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान. तुमच्याआमच्यासारख्यांचे भावविश्व खुंटवणारी घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, लन्च टाइम्, जिम्, स्वयंपाक ही चौकट. पावसासोबत न जगता आल्याने झालेली एकटेपणाची जाणीव आणि पावसाशिवायच्या स्वयंसिद्ध जगण्याची मिजास. मग काहीतरी सुचते, लिहावेसे-बोलावेसे वाटते, कोणासोबत तरी बाहेर जाऊन चिंब भिजावेसे वाटते; वाटते घरी जाऊन दिवाणावर अंग टाकून हजारदा वाचलेले एखादे आवडते पुस्तक हातात घ्यावे, आवडती गझल लावावी आणि कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करावी; उगाचच दूरच्या मित्राला फोन लावून वाफाळत्या कॉफीचा कप हातात घेऊन तासन् तास गप्पा छाटाव्यात आणि ते सुद्धा पॅशिओचा दरवाजा सताड उघडा टाकून त्यालाही फोनवर तो पाऊस ऐकवत. वाटते जमेल तेव्हढा काळोख करून कोचावर पडावे आणि कोसळणारा पाऊस नुसता कानभर साठवून घ्यावा. बोलायचे, सांगायचे तर असते पुष्कळ पण..

.. पण आउटलुक मधला मीटिंग रिमाइन्डर् त्याच वेळी समोरच्या स्क्रीनवर कडमडतो. 'डिस्मिस्' म्हणावे की 'स्नूझ इन् फाइव् मिनट्स ' वर क्लिक् करावे या विचारापर्यंत पोचण्याच्या आतच हृदयाने नकळत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असतो - "च्यायला!"

Tuesday, April 07, 2009

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्‍या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्‍या किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्‍या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.
काही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत. चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्‍यांसाठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.
पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे! काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो. पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
आज भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.
=====================================================================================

प्रस्तुत लेखनातून निखळ करमणूक हाच एकमेव उद्देश आहे. जाणतेपणे कुणाच्याही धार्मिक, प्रादेशिक वगैरे प्रकारच्या भावना दुखावण्याचा दुष्ट हेतू मुळीच नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अजाणतेपणे कुणी दुखावेले गेले असेल, तर उदार मनाने हा लेखनापराध पोटात घालावा, ही कळकळीची नम्र विनंती
=====================================================================================