Thursday, May 11, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

टॅगिंगचा खेळ कदाचित आपल्याला माहीत असेल. एखाद्या विषयाशी संबंधित प्रश्नांची आपण उत्तरे द्यायची आणि आपल्या परिचितांना/मित्रांना तेच प्रश्न विचारून त्यांची या संदर्भातील मते जाणून घ्यायची आणि त्यांनी हीच साखळी पुढे चालवायची असे या खेळाचे स्वरूप आहे. बुक-टॅगिंग हा त्यातला माझा एक आवडता प्रकार. हाच उपक्रम मराठी ब्लॉगविश्वातही राबवावा, या हेतूने हा लेखप्रपंच.
ज्याने हा खेळ चालू केला तो माझा मित्र नंदन होडावडेकर याचे या निमित्ताने पुन्हा एकदा आभार आणि त्याच्या मराठी जगण्याच्या नि जगवायच्या या प्रयत्नांमध्ये माझे खारूताईचे योगदान.
या खेळात अर्थात सर्वप्रथम महत्त्वाचे आहे ते आपले सहकार्य. पुस्तकांविषयी विचारलेल्या काही प्रश्नांची कृपया यथामती उत्तरे आपापल्या ब्लॉगवर लेख (पोस्ट) लिहून द्यावीत आणि शक्य झाल्यास तुमच्या परिचित/अपरिचित मराठी भाषक ब्लॉगर्सना (३ ते ५) हेच प्रश्न विचारावेत. सध्या मराठी अनुदिनीकारांची संख्या
२०० च्या पुढे गेली असल्याने ही साखळी बरीच वाढू शकेल, नवीन पुस्तकांच्या आणि ब्लॉगर्सच्या ओळखी होतील आणि छोट्याशा प्रमाणावर का होईना, माहितीच्या या महाजालात मराठी पुस्तकनिष्ठांची एक मांदियाळी तयार होईल.
असो, नियमांत अधिक वेळ न घालवता मी माझ्यापासून प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करतो

१. सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक -
'लज्जा'
मूळ लेखिकाः तस्लीमा नसरीन
मराठी अनुवादः लीला सोहनी

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती -
बांगलादेशच्या स्वातंत्राच्या वेळी तेथे उसळलेल्या जातीयवादी हिंसाचाराचे आणि तेथील हिंदूंच्या मनातील दहशतीचे,त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, आदर्शवाद विरुद्ध व्यवहारी वृत्ती या झुंजीचे सुंदर चित्रण केलेले हे पुस्तक. आणि ते केले गेले आहे ते एका हिंदू बंगाली कुटुंबाला केंद्रस्थानी ठेवून. प्राण गेला तरी बांगलादेश ही मातृभूमी असल्याने तिला सोडून ज़ाणे ज़मणार नाही या आदर्शवादाला प्राणपणाने ज़पणारे या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सुधामयबाबू दत्त, त्यांचा बेरोज़गार पण तरीही वडिलांप्रमाणेच कणखर,जिद्दी/हट्टी मुलगा सुरंजन, हट्टी मुलाच्या जिद्दीला कंटाळून नि परिस्थितीच्या हातात स्वतःला सोपवून आला दिवस आज़ारी नवऱ्याच्या सेवेत निष्ठापूर्वक व्यतीत करणारी त्याची आई किरण्मयी आणि सुरंजनची धाकटी बहीण माया असे हे कुटुंब. मायाचे जहांगिर नावाच्या एका मुस्लिम युवकाबरोबर प्रेमसंबंध आहेत, जो सुरंजनचा मित्र आहे. जातीयवादी दंगलींच्या पार्श्वभूमीवर हे प्रेमसंबंध, आणि एकूणच या कुटुंबाचे शेजारपाजारच्या मुस्लिम कुटुंबांशी असलेले पूर्वीचे सलोख्याचे संबंध, सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात झालेले बदल/स्थित्यंतरे, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या मनातील विचारांची वादळे, त्यांची स्वतःशीच होत असलेली भांडणे, स्वतःचीच समज़ूत काढणे, त्याचबरोबर आपल्या प्रिय मुला-मुलीबाबत, आई-बाबांबाबत वाटणारी काळजी आणि प्रेम या सगळ्याचे परिणामकारक चित्रण करणारे सुंदर, सजीव, छोटे-मोठे प्रसंग हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. माया घरातून गायब होणे, तिच्यावरील बलात्काराच्या बातमीने हादरलेले दत्त कुटुंब आणि त्यातूनच उद्विग्न झालेल्या सुरंजनने एका वेश्येला घरी बोलावून तिच्यावर 'बलात्कार' करून अघोरी सूड उगवण्याचा अन् आत्मसमाधान शोधण्याचा केलेला अनाकलनीय प्रयत्न, अखेर परिस्थितीला शरण जाऊन मोडून पडलेला सुधामयबाबूंचा आदर्शवाद आणि दत्त कुटुंबाची बांगलादेश सोडून ज़ाण्याची तयारी हा कथेचा नि पुस्तकाचा शेवट.
छोटे-मोठे पण तरीही महत्त्वाचे प्रसंग जिवंत करणारी, व्यक्तिरेखेच्या मनाचे बारीकसारीक पैलू उलगडून दाखवणारी लेखनशैली. सहज आणि प्रवाही अनुवाद. पण दंगलीतल्या आर्थिक आणि मनुष्यहानीची कल्पना देणारी आकडेवारी, वर्तमानपत्रातल्या वास्तववादी तसेच अतिरंजित बातम्या ही पुस्तकाच्या आणि लेखनाच्या सौंदर्याला नि परिणामकारकतेला काहीसे गालबोट लावते असे माझे मत आहे. निर्घृण कृत्यांची, मानसिक हानीची आणि अनुभवांची तुलना आणि मोजदाद आकडेवारीने करता येत नाही. अनुभवांनी पोळलेली माणसे आकडेवारीच्या पलीकडची असतात हेच खरे नाही का!
मूळ लेखिका तस्लीमाबाईंना या पुस्तकाबद्दल बरेच पुरस्कार मिळाले असून बांगलादेशातील कट्टरपंथियांच्या रोषासही त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांची हत्या करणाऱ्यास या मूलतत्त्ववादी, धर्मांध संघटनांकडून खास पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचेही सर्वश्रुत आहे.
अनुवादिका लीलाताई सोहनी यांनाही या अनुवादासाठी महाराष्ट्र शासनातर्फ़े विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके -
तशी बरीच आहेत जसे श्रीमान योगी, स्वामी, मृत्यंजय, पु. ल. ची बहुतेक सगळी पुस्तके, भा. रा. भागवतांचे बालसाहित्य इ. पण चाकोरीबद्ध नसलेली किंवा वेगळी पण तरीही प्रभावी वाटलेली अशी म्हणजे -
महात्म्याची अखेर - जगन फडणीस
झुलवा - उत्तम बंडू तुपे
हिटलर - वि. स. वाळिंबे
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

भावार्थदीपिका - संत ज्ञानेश्वर
गीतारहस्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
स्मृति-चित्रें - लक्ष्मीबाई टिळक
गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे
ययाती - वि‌. स. खांडेकर

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे -
'कोल्हाट्याचं पोर' हे डॉ. किशोर शांताबाई काळे यांचे पुस्तक खूप आवडले. कोल्हाटी समाजातल्या लोकांचे हलाखीचे जीवन, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, निकृष्ट सामाजिक दर्जा नि वास्तववादी जगाशी दूरान्वयानंही नसलेला संबंध, पण तरीही किशोररावांसारख्या काही नवोदितांची जिद्द, जगण्यावरचे प्रेम,पुरोगामी विचार यांमुळे या समाजाला दिसलेले प्रगतीचे नवकिरण या सगळ्याचे चित्रण, किशोररावांची त्यांच्या आईसाठीची भक्ती, प्रेम आणि मानसिक गुंतवणूक यांचे चित्रण हे खरोखरच वाचनीय आहे.
किशोररावांनी एका बक्षीस समारंभाच्या वेळी सांगितलेले त्यांचे अनुभव जेव्हा त्यांच्याच हातून बक्षीसरुपात मिळालेल्या पुस्तकातून, त्यांच्याच शब्दांत जिवंतपणे अनुभवायला मिळाले तेव्हा त्या बक्षीसाचे खरे मोल कळले असे म्हणावयास हरकत नाही.

हा खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी पुढील ५ खेळाडूंची निवड करण्याची प्रक्रिया माझ्यातर्फ़े सध्या चालू असून येत्या आठवड्यात ती पूर्ण होईल अशी आशा आहे. तेव्हा फिरून इथे चक्कर टाकण्याचे आमंत्रण आगाऊच देऊन ठेवतो ः)

मी निवडलेली पहिली खेळाडू: राधिका
मी निवडलेली दुसरी खेळाडू: अदिती

2 comments:

Anonymous said...

hi chakrapani...i was just surfing today and found u on orkut..and ur page ...its really gud.
i wish i had a friend like u
i m urja's friend

Chakrapani said...

thanks for the comments...i am everyone's friend, so you can assume me to be your friend :)