Tuesday, December 19, 2017

दाढी - एक वाढवणे

देशाच्या राजकारणात, समाजकारणात सध्या मुस्लिमांचे स्थान काहीही असो; पण शीरकुर्मा, कबाब, बिर्याणी वगैरे बनवावी त्यांनीच. आणि आपण मस्त चापावी! या यादीत दाढीसुद्धा समाविष्ट केली, तर त्याचे नवल नाही. म्हणजे लांब दाढीचा पिढीजात (आणि धर्मादाय?!) वारसा सांभाळणाऱ्या कुणी गालावर साबण चोळून, वस्तऱ्यातलं ब्लेड बदलून तो गालावर मोरपिसागत फिरवल्याचा जो काही आनंद बिल्डिंगखालच्या मुहम्मदाचा वस्तरा फिरल्यावर व्हायचा, तसा बायकोच्या षठीसामाशी फिरणाऱ्या मखमली (नवागतांना मार्गदर्शन - हे असंच म्हणायचं आणि लिहायचं, ग्राउंड रियालिटी काहीही असो!) हातातूनही कधी जाणवला नाही. मुळातच स्वतःची दाढी स्वतःच करण्याइतकं कंटाळवाणं काम आपल्याच नशिबी का यावं, या विचाराचीच खंत इतकी मोठी असायची, की कॉलेजात असताना अर्ध्याधिक पॉकेटमनी सलूनमध्ये खर्ची घालायला कधी फारसा विचार करावाच लागला नाही. अमेरिकेत आल्यावर विद्यार्थीदशेत आणि नंतरही बाहेरून दाढी करून घेणं बजेटमध्ये बसत नसल्याने झक मारत ते काम स्वतःच करावं लागे. मुळात ते काम वाटणं यातच सगळं आलं. त्यातून इंजिनिअर म्हटल्यावर तो क्लीन शेवन किंवा किमान आखीव दाढी राखणारा असावा, हा समजच अमेरिकेने हाणून पाडला. कामाव्यतिरिक्त तुमची - आणि त्याहूनही महत्त्वाचं, तुमच्या दाढीची - कुणालाच पडलेली नसल्याने, एक काळजी कायमची मिटली. किंबहुना दाढी वाढलीये म्हणजे ऑफिसात दिवसरात्र, अतिमहत्त्वाचं, लय ब्येक्कार काम चाललं आहे, अशीच प्रतिमा सगळ्यांच्या मनात उभी करता यायची. मग मुली बघणे वगैरे कार्यक्रम चालू झाल्यावर, आपली नाही तरी घरच्यांची इज्जत जास्त प्रिय झाल्याने दाढी करावी लागायचीच; पण एकदा लग्न झाल्यावर तो प्रश्नही निकालात निघाला. अधूनमधून फ्रेंच दाढी, गोटी वगैरे प्रकार चालूच असायचे; पण त्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत त्यांच्या आकाराच्या व्यस्त प्रमाणात असल्याने दाढी करायचा कंटाळा एक्स्पोनेनशली वाढायचा. त्यातच केस, दाढी आणि पोट ज्या वेगाने वाढायचं वरदान चिटणीस घराण्यातल्या पुरुषांना लाभलंय, ते देशाच्या विकासदराला लाभतं, तर आज मोदीसरांना जरा कमीच शिव्या खाव्या लागल्या असत्या. पण ते असो. गेल्या वर्षभरात विराट कोहलीपासून रवींद्र जडेजापर्यंत अख्ख्या भारतीय क्रिकेट टीमने दाढी राखली आणि त्यांचं सोशल मीडिया (फिमेल फॅन)फॉलोइंग वाढलं; शाहिद कपूर आणि रणवीर सिंगने दाढी राखली आणि आमच्या हिचं उडता पंजाब, पद्मावती वगैरे नॉन्सेन्स गोष्टींवरचं प्रेम उतू जाऊ लागलं, हे माझ्यासारख्या चाणाक्षांच्या नजरेतून सुटतं, तरच नवल! थोडक्यात दाढी वाढवणं, राखणं आउटराईट 'इन' झालंय, याचा साक्षात्कार झाला. दसरा संपून दिवाळीचे वेध लागतात, तसे नो शेव्ह नोव्हेंबरचे वेध सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच लागले. आणि तो नो शेव्ह नोव्हेंबर वर्षाखेरीपर्यंत लांबवून नववर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारीलाच दाढी करायची, असा संकल्प सोडला. हाच तो क्षण - सप्टेंबर ९, २०१७. यावेळी डोके आणि चेहरा दोन्ही ठिकाणे पेरणीसाठी अनुकूल होती:
मग वाढतावाढता वाढे असणाऱ्या बलभीमाप्रमाणे दाढी वाढू लागली. यापूर्वीही दोन-तीन आठवडे, अगदी एक महिनाही दाढी न करता आपण कसे दिसू शकतो, हे बघितल्याने साधारण ऑकटोबरच्या मध्यापर्यंत  विशेष बदल जाणवलाच नाही. ऑकटोबर १४, २०१७ रोजी ही स्थिती होती:
नाही म्हणायला, 'जरा तरी बरी' दिसावी म्हणून थोडाफार आखिवरेखीवपणा आणायचा प्रयत्न चालू ठेवला होता. ओठ आणि हनुवटीमधल्या जागेत, आणि गाल आणि कल्ल्यांच्यामधल्या मोकळ्या जागेत थोडंफार कोरीवकाम चालू होतं. ऑकटोबरच्या शेवटपर्यंत फार काही बदललं होतं अशातला भाग नाही. ऑकटोबर २६/२७, २०१७ कडे ही परिस्थिती होती:
शेवटी नो शेव्ह नोव्हेंबर उजाडला आणि हनुवटीवरचं कोरीवकाम बंद करायचा निर्णय घेतला. पोराला सुद्धा आता सवय झाली असल्याने उम्मा घेतानाच्या सुरुवातीसुरुवातीच्या "बाबा, दाढी टोचते"च्या कंप्लेंटी मागे पडत चालल्या होत्या. काही मित्रमैत्रिणींनी "काय रे, बायकोला चालते का?" हे ठेवणीतले पण तसे बऱ्यापैकी बोथट झालेले हत्यार उपसलेच; पण बायकोच जवळ नसल्याने, आणि मी ती संधी "ट्रम्पच्या इमिग्रेशन पॉलिसीज किती चुत्त्या आहेत! माझ्या बायकोसारख्या हायली क्वालीफाईड कॅलिफोर्नियन टॅक्सपेअरला सुद्धा केवळ H4-EADच्या घोटाळ्यामुळे काही काळ भारतात जावं लागतंय" असं ठणकावून सांगत, सामाजिक सहानुभूती मिळवून वाया न दवडल्याने, त्या घिस्यापिट्या, पांचट विनोदापासून कायमची मुक्ती मिळाली. तरी नोव्हेंबरात बायको दोन आठवड्यांसाठी का होईना अमेरिकेत काही कामानिमित्त आलीच. तिला रिसीव्ह करायला विमानतळावर गेलो, तर मला "दादा/मामा/काका, दोन मोठ्या आणि दोन छोट्या बॅगा आहेत, किती घेणार ते एकदाच फायनल सांगा" असं तर ती ऐकवणार नाही ना, याचीच धाकधूक होती. पण दिवाळीच्या आसपास मित्रपरिवारात झालेल्या पार्ट्यान्चे फोटोज बघून तिने जरी "बाबा, यू आर लुकिंग सो स्केरी" असे म्हटले असले, तरी किमान 'नवरा' ही ओळख टिकून राहील, याची कुठेतरी आशावाजा खात्री होतीच. तिला ओळख पटली, रिसीव्ह करणे वगैरे पार पाडून घरी आलो. नो शेव्ह नोव्हेंबराचे सबळ कारण पुढे केल्याने बिचारीच्या नल-दमयंती स्वप्नांना गालबोट लागले, अशी तक्रार स्वतःच करून this growth will help you grow in experience, as a human, असा माफीनामाही स्वतःच पदरात पाडून घेतला. प्रेमभंगाचे दु:ख बिअरमध्ये बुडवायची संधी साधायला दहा दिवस लागले. नोव्हेम्बर १८, २०१७ रोजी शेवटी तो सुवर्णयोग आलाच:
मध्यंतरीच्या काळात दाढी वाढवण्याचे प्रयोग करून त्याचे सामाजिक पडसाद काय उमटतात, याचा अनुभव घेतलेल्या काहीजणांशी गप्पा झाल्या. मिडल-ईस्टर्न दुकानात गेल्यावर "हे ब्रदर" संबोधले जाणे, किंवा स्थानिक टॅक्सीचालकांकडून नि ट्रकचालकांकडून 'सतश्री अकाल' ऐकायला मिळणे, वगैरे अनुभव ऐकायला मिळाले. नजीकच्या भूतकाळातला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड वगैरे ठिकाणचा वर्णद्वेषाचा आणि वंशद्वेषाचा इतिहास लक्षात घेता आपल्या 'अशा' दिसण्याने देव न करो पण जीवावर बेतणार नाही ना, याची मनात कुठेतरी खोलवर दडलेली भीती अधूनमधून डोकं वर काढायची; पण स्काईपवर आईशी बोलताना "काय घाणेरडा दिसतोयस, कधी करणार दाढी" असं विचारलं गेलं की आणखी चेव यायचा. मायला, स्वप्नील जोशी, वैभव तत्त्ववादी, इतकंच काय तो कोण कुठला अभिजित खांडकेकर सुद्धा दाढी ठेवतो, तर आम्ही का नाय?! कॅलिफोर्नियाचा कोकण समजल्या जाणाऱ्या सॅन होजे, सांता क्लारा, सनीव्हेलसह झालेल्या संयुक्त महाराष्ट्रात वर्णद्वेषाचा बळी जाण्याइतके आपण कमनशिबी नाही, याचा दिलासा अनेकांनी दिला. त्या बळावर प्रवास चालू ठेवला. अतिप्रेम आणि अतिकोप अशा भावनिक आंदोलनातून जेव्हा पाच वर्षांचं पोर जातं आणि तुमची दाढी हातात धरून सारख्याच भावनावेगानं गदागदा हलवतं, तेव्हा खरं तर मरणप्राय वेदना होऊन बोंब ठोकायची वेळ आलेली असते; पण आदल्याच रात्री तुमच्या मांडीवर बसून एकत्र पिक्चर बघताना, अंगचटीला येऊन अंग घासणाऱ्या मांजरासारखं, त्याने आपलं डोकं नि मान प्रेमाने तुमच्या दाढीवर किमान पाचेक मिनिटं घासून घेतलेली असते, हे विसरता येत नाही. त्या प्रेमळ तैलभावनेने दाढीचीही छान निगा राखली जाते. पाच वर्षाच्या चिमुरड्याला आजपर्यंत जसं डोळ्यात तेल घालून वाढवलं, तसंच दाढीचंही झालंय, हे तुम्हाला कळतं. जातायेता शक्य असेल तेव्हा केस विंचरावेत, तशी दाढीही विंचरणेबल झालीये, हे लक्षात आल्यापासून तुमच्या जीन्सच्या खिशात एक छोटी फणी आलेलीच असते. मिशीला पीळ देणे, तुर्रेबाज मिशी आरशात न्याहाळणे आता तुम्हाला जमू लागल्याने तुम्ही भलतेच खूष असता. मग 'मिशांना तूप लावणे' वगैरे वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग न करता सरळ स्वतःच्याच मिशांवर करायची स्वप्नं तुम्ही बघू लागता. तोवर डिसेंबरचा मध्य उजाडलेला असतो, आणि साधारण डिसेंबर १६, २०१७ ला अशी स्थिती होते:
उरलेल्या पंधरवाड्यात हवी तेव्हढी वाढो, पण नियमित विंचरणे होईल, मिशांना तूप लावून त्या पिळणे होईल आणि ३१ डिसेंबर २०१७ रोजी रात्री झोपायच्या आधी तुम्ही एक 'क ड क' सेल्फी काढून मगच झोपी जाल, असं प्रॉमिस स्वतःला करून तुम्ही तुमचं ब्लॉग पोस्ट थांबवता.

Sunday, August 31, 2014

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

कोकणचा कॅलिफोर्निया करायच्या महाराष्ट्र सरकारच्या वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनाही लाजवेल, अशी किमया आज इथल्या बे एरियातल्या मित्रमंडळींनी करून दाखवली. गणपतीची मिरवणूक ढोल-ताशे वाजवत आणि लेझीमनृत्याच्या तालावर सनीवेलमध्ये काढून, आपापल्या अल्पमतीने जमतील तशा उपचारांनी पूजा आणि तालबद्ध आरती करून साक्षात कॅलिफोर्नियाचा कोकण करून दाखवला. विनोदाचा भाग सोडा, पण नुकताच भारतातल्या बालमित्रांशी, तिथल्या गणेशोत्सवाबद्दल, सहस्त्रावर्तनादी कार्यक्रमांबद्दल भरघोस गप्पा मारून फोन ठेवला आणि वाटलं की योगायोगाने ज्या सांस्कृतिक स्थलांतराचा मी कळतनकळत भाग होऊन गेलोय, ते मुळी स्थलांतर नाहीच. तो विस्तार आहे किंवा झालंच तर सीमोल्लंघन. जो उत्सव भारतात जितक्या उत्साहाने साजरा केला जातोय, जे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम भारतात यथासांग केले जात आहेत, त्याच तोडीचा - किंबहुना कांकणभर सरसच - उत्साह, आणि मुख्य म्हणजे आपलेपणा मला आज इथे जाणवतोय. याचं कारण काय असू शकेल, हा विचार मात्र काही केल्या पाठ सोडायला तयार नाही.

नवीन संबंध, नवीन नाती आणि नवी माणसं जोडणं आणि ती चिरंतन टिकवणं, ही माणसाची आदिम गरज असू शकेल काय? कारण काहीही असो - सण-उत्सव, नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम किंवा अगदी परिचयातल्या कोणाच्यातरी घरी कोणाचा तरी वाढदिवस साजरा करणं किंवा अगदी शनिवार-रविवार आहे आणि फावला वेळ आहे, तेव्हा जेवायला किंवा चहापाण्याला एकत्र भेटणं - नेहमीच्या परिचयातल्या किंवा अगदी एक-दोन नवीन माणसांना भेटता येणं, त्यांच्याशी गप्पा मारता येणं, हास्यविनोद करता येणं, यासाठी वेळात वेळ काढण्याची ऊर्मी असणं, हे या आदिम गरजेचं लक्षण आहे. कदाचित आपल्या जिवंतपणाचं किंवा लौकिकार्थाने समाजशील असण्याचं - अर्थात माणूस असण्याचं. तसं नसतं तर आपापल्या घरी गणपती बसवून, पूजाअर्चा-आरती करून, प्रसाद भक्षण करून आणि नैवेद्याच्या ताटावर आडवा हात मारून ताणून दिली आणि कार्यक्रम संपला, इतपतच गणेशोत्सव आटोपशीर राहिला असता. पण काही मिनिटांपूर्वी, तासांपूर्वी किंवा अवध्या दोनेक महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या सगळ्यांना गावजेवणाचं आवताण धाडून, भोजनोत्तर मनोरंजनाच्या आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सामील करून घ्यावं, इतकं नुसतं 'वाटणं', यातच सगळं आलं. हे 'वाटणं' कधी काळी लोकमान्य टिळकांनी रुजवलं असेल सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून, पण आज त्याचा वेलु गगनावरी गेलाय, हे सनीवेलमध्ये बाकी नक्की दिसून आलं. ते तसं 'वाटणं'च नसतं, तर कशाला कोणी शंभर-दीडशे मोदक करायच्या, रात्ररात्र खपून मखर आणि इतर सजावट करण्याच्या आणि आपण जे करतोय, ते फेसबुक आणि व्हॉट्सॅप वरून अख्ख्या जगाशी वाटून घ्यायच्या फंदात पडलं असतं?

सारांश हा, की या ऋणानुबंधाच्या गाठी जिथून पडतात, ती ठिकाणं, वेळ, प्रसंग सगळं मागे राहतं आणि माणूस म्हणून आपण त्या किती घट्ट करता येतील, यासाठी प्रयत्न करू लागतो. एकमेकांविषयीचं माणूस म्हणून असलेलं अनाम 'वाटणं' ही या गणगोतनाट्याची तिसरी घंटा असते आणि सुरुवातीला मी म्हटलेल्या आपलेपणाचा अव्याहत प्रवास हा असा चालू झालेला असतो.

Tuesday, March 01, 2011

बोलकढी

धक्के बसतच असतात आयुष्यात. या ना त्या कारणाने. शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक - कसेही! कॅलिफोर्नियातल्या दुकानात चितळ्यांची बाकरवडी 'क्रिस्पी स्पायसी स्प्रिंग रोल्स' म्हणून आणि बेडेकरांची थालीपीठ भाजणी 'ठेपले का आटा' म्हणून ठेवलेली दिसली तेव्हा बसलेला सांस्कृतिक धक्का; मिसळ, साबुदाणा वडा, थालीपीठ यांचा जोडीला दादरच्या प्रकाशमध्ये डोसा किंवा तत्सम दाक्षिणात्य पदार्थ मेन्यूकार्डावर दिसले तेव्हा, साक्षात सिंहगडाच्या पायथ्याशी चाललेल्या नंग्यानाचाची बातमी वाचली तेव्हा, रायगडावरच्या दारूपार्टीची पेपरात छापून आलेली छायाचित्रे पाहिली तेव्हा बसलेला सामाजिक धक्का इत्यादी इत्यादी इत्यादी. त्यामुळे धक्क्यांची तशी नवलाई उरलेली नाही. मराठी माणसाला आणि मराठी मानसाला तर नाहीच नाही! असले कित्येक धक्के पचवल्याचं हा मराठी माणूस छाती पुढे करून, असलेल्या-नसलेल्या मिशांना पीळ देत, दंड थोपटून सांगत आला आहे. त्यामुळे असल्या छोट्यामोठ्या धक्क्यांचं काय ते कौतुक, नाही का? असले धक्के देण्याच्या निमित्ताने चितळे बाजीराव रोडवरच्या दुकानातून थेट कॅलिफोर्नियात येऊन पोहोचले, हे काय कमी आहे? त्यांच्या त्या पुण्यातल्या दुकानात जाऊन पाव किलो 'क्रिस्पी स्पायसी स्प्रिंग रोल्स' मागितले असते, तर कदाचित मला आर्थिक दंडच झाला असता; झालंच तर खाकी बुशशर्टातल्या, डोक्यावर पांढरी गांधीटोपी मिरवत दुकानातली गिर्हाइकं हाकणार्या कुणी माझ्या सात पिढ्या दुकानाच्या आसपास दिसू नयेत, अशी सोयही करून टाकली असती. पण जागतिकीकरणाच्या वार्यावर आरूढ होऊन चितळ्यांनी, बेडेकरांनी, रामबंधूंनी जी 'जंप मारली' त्याचं एक मराठी माणूस म्हणून मला कौतुक वाटलंच पाहिजे राव! मग थालीपीठ नि ठेपल्यातला, बाकरवडी नि स्प्रिंग रोल्स मधला आणि त्यायोगे एकंदरच मराठी भाषा, संस्कृती, मराठी मानसं आणि मराठी माणसं आणि बाकी सगळे यांच्यातला फरक दुर्लक्षित करता यायलाच हवा. मराठी आहेच मुळी सोशिक!!

'जंप मारण्या'वरून आठवलं. आजकाल मराठीत काहीही मारता येऊ लागलं आहे. शाळाकॉलेजातली पोरंपोरीही एकमेकांना 'फोन मारून', कोणत्या सरांच्या किंवा बाईंच्या तासाला 'कल्टी मारायची', ते झाल्यावर कुठे भेटून 'चहा-सिगरेट मारायची', कोणता पिच्चर 'टाकायचा' आणि या सगळ्या बेतात आडकाठी आणायचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याची कुठे कशी 'मारायची' हे सगळं आधीच ठरवून विद्यालयांमध्ये जात असतात. अर्थात यात वावगं काहीच नाही. मराठी आहेच मुळी सोशिक!! आणि नुसतीच सोशिक नाही, तर लवचिक आणि सर्वसमावेशक!! आणि ती तशी नसती, तर आता आहे त्या अढळपदाला येऊन पोचली असती का?

पोचण्यावरून आठवलं. मराठी पिच्चर आणि नाटकं कुठे येऊन पोचलीयेत राव! संगीत नाटकांच्या टेस्ट म्याचेसवरून आम्ही थेट दीड-दोन अंकी नाटकांच्या ट्वेन्टी-ट्वेन्टीवर येऊन पोचलोत, आहात कुठे??!! आणि आमचे आजकालचे पिच्चर क्कस्सले झगामगा झालेत बघितलेत का? अशोक-लक्ष्या-सचिनच्या वेळचे लो बजेट पिच्चर जाऊन जमाना झाला आता! आता तर आमच्या पिच्चरमध्ये पण आयटम साँग असतं - ते सुद्धा हिंदी आणि इंग्रजीत!! कानावर 'चमचम करता है यह नशीला बदन' पडतं; पण डोळ्यांना मादक, 'मस्तीभरी' सोनाली बेंद्रे दिसते ना! सध्या ऑस्ट्रेलियात असते. नवरा पंजाबी आहे, पण आपल्याला काय त्याचं?! सोनाली मराठी आहे ना मूळची? तिच्या मूळच्या मराठी असण्याचा आपल्याला भारी अभिमान असायला हवा!

मराठीपणाचा अभिमान वाटण्यावरून आठवलं. सुनील गावस्करपासून ते अजित आगरकरपर्यंत (झालंच तर रमेश पोवारपर्यंत), शांतारामबापूंपासून ते महेश मांजरेकरपर्यंत, दुर्गाबाई खोट्यांपासून ते सोनाली 'अप्सरा' कुळकर्णीपर्यंत सग्गळ्या मराठी माणसांचा आम्हांला 'बाय डिफॉल्ट' अभिमान वाटत आला आहे; नव्हे, तो तसा वाटलाच पाहिजे. तेच मराठीपणाचं व्यवच्छेदक का काय म्हणतात ते लक्षण आहे. तो तसा वाटला नाही, तर लेंगा-बनियनवर भिंतीला तुंबड्या लावून चहा ढोसत महाराष्ट्र टाईम्स वाचायचीही आमची लायकी नाही.

महाराष्ट्र टाईम्सवरून आठवलं. 'नॉट ओन्ली मिस्टर राऊत' पण केतकर, टिकेकर, कुवळेकर - एकुणातच सग्गळे क्कस्सले धंदेवाले - आय मिन व्यावसायिक झालेत ना?! झगामगा फोटो, म्हिंग्लिश बातम्या, असंख्य जाहिराती. त्यांच्या सायटी पाहिल्यात का राव!! महाराष्ट्र टाईम्स तर वृत्तपत्र कमी आणि काव्यपत्र जास्त झाल्यासारखा असतोय आज काल. परवा भारत वि. दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याच्या वृत्ताचं शीर्षक काय होतं माहितीये? 'कॅलिसच्या मदतीला आमला जमला; भारत दमला' (!!!) सकाळसकाळचा 'सकाळ' पण मागे नाही बरं का! समाजातल्या तळागाळातल्या हौशी लेखकुंना मराठी साहित्याचे पाईक आणि मानदंड बनवण्यात सकाळाच्या मुक्तपिठाने जो खारीचा वाटा उचललाय, त्याचा एक मराठी माणूस म्हणून तरी मला जाज्ज्वल्य अभिमान वाटलाच पाहिजे. किंबहुना अशाच सदरांमुळे तरुणाईला आणि मराठीतील नवागतांना मराठी साहित्यात रुची निर्माण होईल, असा दृढ विश्वास 'सकाळ'प्रमाणेच मलासुद्धा वाटत आला आहे.

मराठी साहित्यावरून आठवलं. आजकालचं मराठी साहित्य हे केवळ वह्यापुस्तकांमध्येच अडकून पडता संगणकावर आणि त्याच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात जाऊन पोचलंय म्हणे. खूप मराठी सायटी पण निघाल्यात म्हणे. मराठीत त्यांना संकेतस्थळं का कायतरी म्हणतात. कविता, गद्य, चर्चा, पाककृती, क्रिकेट, विज्ञान, भाषाशास्त्र - जगातला एकही विषय आता बाकी नाही, ज्यावर मराठीत आणि मराठी सायटींवर लिहिलं गेलं नाही. इन्टरनेटने जगाला जवळ आणलं आणि या सायटींनी जगभरातल्या मराठी माणासांना आणि मराठी मानसांना. साहेबाचा साम्राज्यसूर्य जसा जगातल्या कोणत्याच भूमीवर कधीच मावळायचा नाही, तसंच अगणित मराठी माणसं असंख्य मराठी सायटींवरून कधीच मावळत नाही. अर्थात, जिकडे मराठी माणूस आला, तिकडे हेवेदावे आले, खटके उडणे आले, हमरीतुमरी आली, 'बा'चा'बा'ची आली; पण ते असो. तेच तर मराठीपणाचं आणखी एक व्यवच्छेदक लक्षण नाही का?! अनेकजण उपद्रवी असले तरी मराठीच आहेत ना?! मग मोठ्या, उदार अंतःकरणाने वगैरे त्यांना माफ करायचे. मराठी आहेच मुळी सोशिक!! आणि नुसतीच सोशिक नाही, तर लवचिक आणि सर्वसमावेशक!! आणि ती तशी नसती, तर आता आहे त्या अढळपदाला येऊन पोचली असती का?

आजकाल काहीजण उगाचच तिच्या र्हासाच्या नावाने गळे काढत असतात. मग जागतिक मराठी दिन वगैरे साजरे करून त्यांना दाखवून द्यावे लागते मराठी काय आहे, मराठी कुठे आहे ते. आमची आजची मराठी पिढी बर्गरग्रस्त असली, तरी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाच्या वेळी आमच्याकडे खाद्यपेयांचे स्टॉल लावतात ना, तेव्हा त्यांना साबुदाणा खिचडीच खावी लागते; बटाटावडाच खावा लागतो आणि मसाला दूधच प्यावं लागतं. नको तिकडे लाड करायला मराठी कधीच शिकवत नाही, कधी शिकवलंही नाही. आम्ही तिची डोळ्यांत तेल घालून, महाराष्ट्र मंडळं काढून, मराठी पिच्चर बघून, बालमंदिरांमधून 'देवा तुझे किती सुंदर आकाश' वगैरे शिकवून इतकी काळजी घेतो, तर तिचा र्हास होईलच कसा? देशातल्यांना उगाचच काळजी. डोन्ट यू वरी मराठी मानूस! आमच्याकडे तर आम्ही विश्व मराठी साहित्यसंमेलनसुद्धा केलंय. आम्ही सुरुवात केल्यावर मग मागाहून दुबई, लंडन वगैरेची मंडळं जागी झालीत!!

विश्व मराठी साहित्य संमेलनावरून आठवलं. पुढच्या जागतिक मराठीदिनी विश्व मराठी खाद्ययात्रा भरवायचा प्रस्ताव मंडळाकडे ठेवला तर? निलेश लिमयेला वगैरे आम्हीही सारे खवय्ये आहोत हे दाखवून द्यायचे; सरकारकडून मस्त अनुदान वगैरे मिळवायचे; शनिवार-रविवारच्या नाश्तापाण्याची, जेवणाची सोय करायची. त्याच सुमाराला हिची डिलिवरी पण असेल; म्हणजे खाद्ययात्रेच्या निमित्ताने आईबाबांची तिकिटंपण स्वस्तात होऊन जातील! काय आहे, या माझ्या बोलकढीपेक्षा खरीखुरी गुलाबी सोलकढी, पांढराशुभ्र फळफळीत भात आणि पापलेटचा गरमागरम तुकडा ताटात पडला की आमचं मराठीपण आणखी उठून दिसतं ना!

Wednesday, April 21, 2010

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत. शाळेत इतिहास शिकताना क्वचित एखादा धडा अरबी टोळ्या, अल-जेब्रा, हादिस नि कुर-आन, नौरूज याबद्दल बोलू लागला की इतिहासासारखा विषयही आवडू लागायचा (इतर वेळी १८५७ ते १९४७ सोडून काही वाचायला मिळायचे नाही, हा भाग वेगळा!) अगदी अलीकडेपर्यंत अयातुल्ला खोमेनी, माह्मूद अह्मदेनिजाद वगैरे नावे कानावर पडत; इराण-पाकिस्तान-भारत गॅस पाइपलाइनसंबंधीच्या बातम्या वाचायला-ऐकायला मिळत; तेव्हाही कान आणि डोळे त्यांच्या दिशेने आपसूकच वळायचे. गाडी घेऊन सनीवेलातल्या रज्जो मध्ये पराठे खायला बाहेर पडावे नि बाजूच्याच चेलोकबाबी मधील लाल-पिवळा मंद प्रकाश नि ताज्या, गरम कबाबांचा वास पराठ्यांच्या बेताबद्दल मनात 'सेकन्ड थॉट' निर्माण करून जावा, असे आजवर अनेकदा घडले आहे. कालच्या टॅब्लॉइड ऑफ इन्डिया मधील ही बातमी वाचली आणि पर्शियाशी (आताचा इराण) आपले पोट, राजकीय नि ऐतिहासिक संबंध - नि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक भूक - किती घट्ट जोडले गेले आहेत, याचा विचार नकळतच मनात डोकावला. कचेरीतील सोमवार संध्याकाळची वेळ, हातात गरमागरम चहा, कचेरीतील जवळच्या मित्राशी या सगळ्यावरून झालेल्या गप्पा आणि विचारांची देवाणघेवाण याची परिणती म्हणजे ही खरड.

मुळात तेहरानला नजीकच्या भविष्यकाळात प्रचंड मोठ्या भूकंपाचा गंभीर धोका आहे, हे राष्ट्राध्यक्षांनी जाहीर करावे नि त्यानुसार पावले उचलायच्या तयारीस लागावे, याला खूळ म्हणावे की दूरदृष्टी हे कळण्याइतपत पुरेशी माहिती माझ्यापाशी नाही. तसेही इराणला भूकंपांचे वावडे नसावे. १८२०-३० मध्ये तेथे सगळ्यात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर अमेरिकेशी सततची भांडणे, पाकिस्तानातून अण्वस्त्र निर्मितीसंबंधित तंत्रज्ञानाची चोरी, इराकबरोबरचे युद्ध नि आता अमेरिकेच्याच पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांमार्फत आर्थिक निर्बंध लादून इराणची कोंडी अशा एक ना अनेक कारणांनी इराण हादरत असतेच. पण बातमीतील इराणी महाशयांच्या वक्तव्याने इराण नाही तर बाकीची दुनिया हादरेल, हे मात्र नक्की! लौकिकार्थाने कापसाची किंवा तागाची शेती, कृत्रिम धाग्यांची निर्मिती, गिरण्यांचे संप, रेडीमेड कपड्यांची आयात, फॅशन, जगप्रसिद्ध फॅशन डिझाइनर्स यांच्याशी फारसे जवळचे संबंध असणार्‍यांपैकी इराण नाही. तसे असतानाही धर्मात नमूद केल्यानुसार स्त्रियांनी नखशिखान्त अंग झाकणारी वस्त्रे परिधान करण्याचा पुरस्कार करणारे हे इराणी महाशय तसे संकुचित विचारांचेच म्हटले पाहिजेत. आकाराने तसेच संख्येने कमीत कमी कपडे वापरून त्यायोगे यंत्रमागांची घरघर, वातावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे कमी करण्याच्या दृष्टीने सगळे जग पावले उचलत असताना हे महाशय मात्र अगदी विरुद्ध दिशेने वाटचाल करू पाहत आहेत. याबद्दल खरे तर इराणाचा सार्वत्रिक निषेध व्हायला हवा; पण इराणने आपल्याला इतके काही भरभरून दिले आहे की निदान मला तरी असा निषेध करवत नाही.

इराण म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतो तो 'कोपर्‍यावरचा इराणी'. मुंबईत एके काळी बहराला आलेली ही जमात आजकालच्या पिढीला माहीतदेखील असेल की नाही, अशी शंका येते. बरे आपण म्हणावे "तो कोपर्‍यावरचा इराणी.." आणि समोरच्याने "कोण रे?" असे विचारून आपलेच दात घशात घालावेत, अशी स्वतःची गत करून घ्यायला मला तरी आवडायचे नाही. इराण्याला नाव नसतेच. ज्याच्या हाटेलावर नावाची पाटी असेल, तो अस्सल इराणी नाहीच. किंबहुना तो नेहमी कुठल्यातरी कोपर्‍यावरचाच असल्याने नि तुम्ही मुंबईत जेथे कोठे असाल, तिथून कोपरभरच लांब असल्याने 'कोपर्‍यावरचा इराणी' इतकीच त्याची ओळख पुरेशी असते. मग ते भेटीचे ठिकाण असो, नवख्या माणसाने पत्ता चुकू नये म्हणून सांगायची खूण असो, सकाळी कचेरीत जायच्या आधी ब्रून-मस्का किंवा बन-मस्का, आम्लेट-पाव नि कटिंग हा ठरलेला नाश्ता हाणायची जागा असो की फुकटात पेपर वाचायला मिळायचे नि त्यातील बातम्यांचा काथ्याचे (व घड्याळ्याच्या काट्यांचे!) कूट करायचे वाचनालय! कॉलेजात जायला लागल्यावर मग घरी येताना मटण पॅटिस किंवा खिमा पॅटिस, टोस्ट किंवा खारी, कधी लहर आलीच तर पुडिंग, चहा नि सिगरेट असा शाही बेत मित्रांच्या संगतीने जमवायचा. तुम्ही नेहमीचे गिर्‍हाइक असाल, तर तुम्हाला खुर्ची उलटी फिरवून बसण्याचीही मुभा असते. शक्य तितक्या जुनाट काळ्या रंगाची खुर्च्या-टेबले, त्यांवर तितक्याच उठून दिसणार्‍या पांढर्‍या कपबशा नि बाउल्स, स्टीलचे चकचकीत चमचे आणि रोमन आकडे असलेले, टोल्यांचे पण कधी टोले न वाजणारे घड्याळ ही अस्सल इराण्याची ओळख आहे. कालौघात त्याच्या पुढील पिढीतील नतद्रष्टांनी हाटेलांना 'कॅफे गुडलक' किंवा तत्सम नावे देणे, आतले फर्निचर नूतनीकरणाच्या नावाखाली बदलणे, विनाकारण उत्तर भारतीय नि दाक्षिणात्य पदार्थही उपलब्ध करून देणे वगैरे सांस्कृतिक भेसळ करून ही ओळख पुसायला सुरुवात केली. मॅक्डोनाल्ड वगैरे चालू झाल्यावर तर सगळी पिढीच बिघडू लागली; पण निष्ठावान खवय्या इराण्याला विसरला नाही नि त्याच्याच जिवावर उरलासुरला इराणी अजूनही तग धरून आहे. अंधेरी स्टेशनबाहेरील मॅक्डोनाल्ड मध्ये जितकी गर्दी असते त्याच्या अनेकपट गर्दी समोरच्या इराण्याकडे असते! मॅक्डीच्या बाहेरील जोकर जितके लक्ष वेधून घेत नाही तितके इराण्याच्या बसक्या कपाटाच्या काचेमागील पिवळाजर्द वर्ख नि पापुद्रे ल्यालेले नि वेड लावणारा घमघमाट सुटलेले खिमा पॅटिस, मटण पॅटिस, खारी, मावा केक वगैरे मला खुणावत असतात.

नदीचे मूळ नि ऋषीचे कूळ विचारू नये असे काहीतरी ऐकून आहे. इराण्याच्या बाबतीतही हे तितकेसे खोटे नसावे. कारण ज्याला भारतात लौकिकार्थाने पारशी समजले जाते तो मूळचा इराणी (पर्शियन) आहे, आणि इराणी असूनही त्याचा धर्म मुस्लिम नाही, त्याला दाढी नाही तर डोकीवर ज्यूंसारखी छोटी लाल गोल टोपी नि अंगात पैरण आहे वगैरे लक्षात येऊ लागले की गोंधळ उडालाच म्हणून समजा. अलीकडे महंमद अली रोड वर काही इराणी ढंगाची हाटेले दिसली ते हायब्रिड इराणी किंवा अस्सल मुसलमान असावेत, असे वाटते. त्यांच्याकडे बिर्याणी, खिमा, चिकन कोर्मा, कबाब वगैरे हाणायला मिळते; त्याची लज्जत औरच. पण त्याची ब्रून-मस्का नि चायशी तुलना करू नये. यू कॅनॉट कम्पेअर अ‍ॅपल्स अ‍ॅन्ड ऑरेन्जेस! (यू मे लव बोथ, दो!) त्यामुळे इराणी ईद साजरी न करता नौरूज कसा काय साजरा करतो, मशिदीत न जाता अग्यारीत कसा सापडतो इ. प्रश्नांचे खरे उत्तर इराणमध्ये ईद आणि नौरूज दोन्ही जोरदार साजरे कसे होतात, याच्याच उत्तरात दडले आहे. किंबहुना इराणमधील बिगरमुस्लिम इराणी तेथील जाचक धार्मिक निर्बंधांना कंटाळूनच भारतात येऊन थडकला असावा की काय, अशी कधी कधी शंका येते. प्रत्यक्षात, हा झोराष्ट्रीयन समाज बव्हंशी इराणबाहेर स्थलांतरीत झाल्यानंतरच तेथे मुस्लिमप्राबल्य असलेले लोकजीवन रुजले, असे कुठेतरी वाचायला मिळाले. आणि ते नुसतेच रुजले नाही तर बहरलेसुद्धा!

शॉर्ट स्कर्ट्स, फ्रॉक्स आणि डोक्याला रुमाल बांधलेल्या पारशी तरुणींचे मूळ मुस्लिमप्राबल्य असलेल्या मध्यपूर्वेतील इराणमध्ये आहे, यावर तर सुरुवातीला विश्वासच बसत नसे. खरे तर गोरा रंग, धनुष्याकृती रेखीव भिवया, सरळ तजेलदार नाक, पाणीदार डोळे, मधाळ हसू आणि कमनीय बांधा यांच्या कसोटीवर खरी उतरणारी पारशी तरुणी विरळीच. पारशी तरुणींनी जमाना नाचवावा तो फॅशन, बिनधास्तपणा नि रंगीबेरंगी फुलांची किंवा इतर मुक्तहस्त चित्रे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कपड्यांच्या जोरावर. याउलट उपरोल्लेखित गुणविशेष असलेली इराणी मुस्लिम तरुणी तुलनेने कमी बोलकी, अदबशीर, सोज्वळ चेहरेपट्टी असलेली; गोड बोलणारी. अर्थात पारशी संस्कृती भारतात बहरली नि इराणी मुस्लिम संस्कृती इराणमध्ये. त्यामुळे इराणमधील स्त्रियांच्या जीवनाबद्दल जे काहीशा विस्ताराने ऐकता आले, ते कचेरीतील दोन इराणी स्त्री सहकार्‍यांकडूनच. इराणमधील स्त्रीवर्गात शिक्षणाचे वाढू लागलेले प्रमाण, गणित नि विज्ञानातील तसेच स्थापत्यशस्त्रातील प्रगती व त्यातील स्त्रियांचे योगदान, स्त्रीवर्गाचा कला, साहित्य नि पत्रकारिता क्षेत्रातील वाढता प्रभाव याबद्दल त्या भरभरून बोलतात तेव्हा इराणमधील स्त्रीजीवनाची व त्यातील स्थित्यंतराची पुसटशी तरी कल्पना यावी. असे असताना टाइम्स ऑफ इन्डियामधील उपरोल्लेखित बातमीमधील मुक्ताफळे उधळणार्‍या इराणी मुल्लाची मते या प्रगतीशील समाजाला कशी मागे खेचू पाहत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.

बर्‍यापैकी खुलेआम पद्धतीने इराणमध्ये चालू असलेली अण्वस्त्रनिर्मिती; पाकिस्तानातून झालेली तंत्रज्ञानाची चोरटी आयात; धगधगते, प्रतिकूल, इराणविरोधी आंतरराष्ट्रीय वातावरण नि दबाव या सगळ्याला सध्या सामोरा जात असलेला इराणी गझला, रुबाया, फार्सी भाषा, प्रिन्स ऑफ पर्शियासारखे लोकप्रिय संगणकी खेळ, सोहराब नि रुस्तुम च्या रंजक गोष्टी, आशियाई फुटबॉल, वेगवेगळ्या प्रकारच्या चहांची चाहत, गोलाब नि त्याचे अत्तर या सगळ्याशीही थेट संबंधित आहे, हे नजरेआड करता येत नाही. मध्यपूर्वेतील या अ‍ॅटमबॉम्बच्या पोटात दडलेली ही सगळी रसायने जगात अगोदरच सर्वसमाविष्ट झाली आहेत. पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.

Tuesday, March 09, 2010

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच,
मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -
https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

Thursday, October 15, 2009

पाऊस कधीचा पडतो

दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता. "च्यायला!" हा उद्गार म्हणजे त्या दुर्दैवाचे, अस्वस्थतेचे उत्स्फूर्त, मूर्तीमंत, सगुण रूप. परवाच्या दिवशीचा कोसळणारा पाऊस कार्यालयातील माझ्या खुराडात बसून (नुसताच) ऐकताना पदोपदी मला हेच 'च्यायला' माझ्याच आतून ऐकायला मिळत होते.

महिनाभरापूर्वीच भारतात असताना तिथला पाऊस अंगावर झेलला होता. खरे तर भाद्रपदातला पाऊस अंगावर घेणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे. त्यातून दौर्‍यातला प्रत्येक क्षण 'मंगऽलमूर्ती मोऽरया, गऽणपती बाप्पा मोऽरया' च्या जयघोषात बुडवून घेतलेला. तब्बल चार वर्षांनंतर ऐकलेले ते 'तत्तर तत्तर तत्तर तत्तर..' कानात साठवून घेताना पावसाकडे लक्ष कधी आणि कसे द्यावे?! नाही म्हणायला दोनदा शिवनेरीने मुंबई-पुणे केले तेव्हा घाटात त्याची नि माझी भेट झाली खरी; पण ती सुद्धा एका बंद काचेच्या अल्याड-पल्याडच्या अवस्थेत. एखादा कैदी नि त्याला भेटायला येणारे नातेवाईक जसे बंद गजांच्या अलीकडे-पलीकडे भेटावेत, अगदी तसे! किंवा अमेरिकन दूतावासात व्हिसाच्या रांगेत ताटकळल्यावर बुलेटप्रूफ काचेपल्याडच्या गोर्‍या अधिकार्‍याच्या प्रश्नांची इमानेइतबारे उत्तरे देण्यासाठी उभे रहावे, तसे! फरक इतकाच, की चार वर्षांपूर्वी मी मुंबईतला पाऊस मनात कैद करून घेऊन अमेरिकेत आलो होतो; नि या वर्षी मीच त्याच्याकडे त्याचाच कैदी म्हणून गेलो होतो. ते सुद्धा कोणत्याही व्हिसाशिवाय!

घाटातला पोपटीपिवळा रंग उतरणीला लागलेल्या पावसातही आपला ताजेपणा टिकवून होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यासारखा. खोपोली ते लोणावळा पट्ट्यामध्ये कोसळणारे दुधी धबधबे, कड्याकपारीमधून अचानक दिसणारे फेसाळते झरे मनातही कित्येक खळखळत्या आठवणी जागे करून जात होते. अशाच एका पावसाने कधी माझी आजी माझ्यापासून हिरावली होती; आणि त्याच वेळी नव्याने ओळख झालेल्या नि कालौघात सर्वोत्तम ठरलेल्या मित्रांशी गाठ घालून दिली होती. चार वर्षांपूर्वीच्या पावसाने मातृभूमी सोडताना असे काही रौद्र रूप दा़खवले होते की हाच पाऊस आपला इतका लाडका का आणि कसा असू शकतो, असा प्रश्न पडला होता. त्यावेळी नवीकोरी पुस्तके नि दप्तरे घेऊन शाळेची धरलेली वाट, रेनकोटाची टोपी मुद्दामहून काढून भिजत घरी आल्यावर आईचा खाल्लेला मार, आले-लिंबू-वेलची-पुदिना घातलेला गरमागरम चहा, हवाहवासा वाटणारा एक चेहरा, निरोप देताना पाणावलेले आईवडिलांचे डोळे, मायभूमीतला चिखल, चौपाटी, ओल्या मातीचा वास, टपरीवरचा चहा आणि वडापाव, उद्यान गणेश च्या मागचा भजीपाव, मित्रमैत्रिणीसोबतचा भिजता टाइम् पास्, सॅन्डविच् नि कॉफी, सगळे डोळ्यांतल्या ढगांमागे सारून विमानात बसलो होतो. आणि यावेळी मात्र कोणाचीतरी आयुष्यभराची साथ, स्वप्ने, आशाअपेक्षा, जबाबदारी आणि प्रेम - सगळे सामावलेली अंगठी बोटात मिरवत! पाऊस मात्र कधीचा पडतच होता नि पडतच राहिला.

पाऊस काय फक्त रेल्वे वाहतूक नि जनजीवनच विस्कळीत करण्यासाठी असतो? छे! तो विस्कळीत करतो एक चाकोरीबद्ध राहणीमान. तुमच्याआमच्यासारख्यांचे भावविश्व खुंटवणारी घर ते ऑफिस, ऑफिस ते घर, लन्च टाइम्, जिम्, स्वयंपाक ही चौकट. पावसासोबत न जगता आल्याने झालेली एकटेपणाची जाणीव आणि पावसाशिवायच्या स्वयंसिद्ध जगण्याची मिजास. मग काहीतरी सुचते, लिहावेसे-बोलावेसे वाटते, कोणासोबत तरी बाहेर जाऊन चिंब भिजावेसे वाटते; वाटते घरी जाऊन दिवाणावर अंग टाकून हजारदा वाचलेले एखादे आवडते पुस्तक हातात घ्यावे, आवडती गझल लावावी आणि कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करावी; उगाचच दूरच्या मित्राला फोन लावून वाफाळत्या कॉफीचा कप हातात घेऊन तासन् तास गप्पा छाटाव्यात आणि ते सुद्धा पॅशिओचा दरवाजा सताड उघडा टाकून त्यालाही फोनवर तो पाऊस ऐकवत. वाटते जमेल तेव्हढा काळोख करून कोचावर पडावे आणि कोसळणारा पाऊस नुसता कानभर साठवून घ्यावा. बोलायचे, सांगायचे तर असते पुष्कळ पण..

.. पण आउटलुक मधला मीटिंग रिमाइन्डर् त्याच वेळी समोरच्या स्क्रीनवर कडमडतो. 'डिस्मिस्' म्हणावे की 'स्नूझ इन् फाइव् मिनट्स ' वर क्लिक् करावे या विचारापर्यंत पोचण्याच्या आतच हृदयाने नकळत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असतो - "च्यायला!"

Tuesday, April 07, 2009

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा. त्यामुळे अगदी आजतागायत अभ्यास न करणार्‍या नतद्रष्ट लहानग्यांपासून ते अगदी अमेरिकेच्या अध्यक्षमहाशयांपर्यंत कोणालाही 'जोड्याने' हाणले पाहिजे असे कोणी म्हटले की हाणणार्‍या किमान दोन व्यक्ती तरी असाव्यात, असे चित्र आपसूकच उभे राहते. मात्र नजीकच्या भूतकाळात आमचा हा समज एका इराकी पत्रकाराने चुकीचा ठरवला. त्याने बुश महाशयांना चढवलेल्या बुटांच्या प्रसादावरून जोड्याने हाणणे म्हणजे एकाच व्यक्तीने दोन जोडे मारणे हा सुद्धा अर्थ होतो, हे सुद्धा मान्य करावे लागले. एका अर्थाला दुसर्‍या अर्थाची जोड (की जोडा) मिळाला.
काही संस्कृतींमध्ये जोडे फेकून मारणे हे उच्च प्रतीच्या, नीचपणे केलेल्या अपमानाचे व्यवच्छेदक लक्षण कसे काय असू शकते, हे बाकी आम्हांला अजून समजलेले नाही. पुण्यात कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त जोडे हाणायची जी संस्कृती विकसित झाली आहे, तिची लागण या बाकीच्या संस्कृतींना झाली नसावी. बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे की तिथे जोडे हाणायचे असल्यास ते पायात घालावेच लागतात अशातला भाग नाही. तिथला मराठी माणूस जोडे हाणण्यात पटाईत असल्याने वडेवाले जोशी जरी एकमेवाद्वितीय असले, तरी जोडेवाले जोशी बरेच आहेत. चप्पलबुटांची खरी गरज पडते ती मुंबईत. तिथे कफ परेड, नेपिअन्सी रोड सारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधली कुत्रीमांजरीही अगदी रिबिन् बिबिन् लावलेले डिजाइनर् शूज् घालून हिंडताना आम्ही पाहिली आहेत. वार्धक्याकडे झुकू लागलेल्यांसाठी किंवा नेमाने लाफ्टर् क्लबात, प्रभातफेरीला (मॉर्निंग् वॉक् !) जिम् मध्ये जाणार्‍यांसाठी स्पोर्ट्स शूज् ; कार्यालयात जाताना, लोकलमधून प्रवास करताना घालायचे चप्पल-बूट वेगळे नि मंगल कार्यालयात जातानाचे, प्रवासाला जातानाचे वेगळे; महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी आठवड्याला जो पोशाख घालायचा त्या प्रत्येक पोशाखामागे एक या दराने घालायचे चप्पल-बूट आणि सप्ताहाअंतीच्या स्नेहसंमेलनांसाठी, पार्ट्यांसाठी, ट्रेकिंग-हायकिंग साठीचे, लग्नमुंजीदी समारंभप्रसंगी घालायचे वेगळे बूट; असा सगळा जय्यत जामानिमा असतो. टाकून दिलेल्या चपला-बुटांचे पुनर्नवीकरण करायचे, पुनर्निर्माणाचे जे प्रकल्प धारावीसारख्या उद्योगजगतात आकाराला आले आहेत, त्यांच्या यशामागेही याच बहुरंगी बहुढंगी पादत्राणांचा फार मोठा हातगुण (की 'पाय'गुण) आहे.
पादत्राणे या शब्दांपासून तयार झालेल्या विशिष्ट शब्दचमत्कृतीची मजा बालसुलभवयात सगळ्यांनीच घेतलेली आहे, याबाबत दुमत नसावे. पण नेहमीची बस/ट्रेन पकडण्यासाठी धावताना अथवा ती चुकल्यावरची पायपीट करताना, शेजारी बसलेल्या किंवा उभे असलेल्या सहप्रवाशाच्या जड ब्यागेचा किंवा त्याच्या स्वतःच्या जडत्त्वाचा त्रास सहन करताना, टॅक्सी-रिक्षावाल्यांच्या संपासारख्या बिकट परिस्थितीत तंगडतोड करताना जी पायातले (पादण्यातले नव्हे! काढलेत ना दात लगेच?!) त्राण कायम ठेवतात ती पादत्राणे हा गर्भितार्थ केवळ अनुभवातूनच उलगडत जातो. पूर्वी वधुपित्यांची पादत्राणे त्यांच्यातले त्राण जिवंत ठेवण्याऐवजी काढून घेत असल्याचे ऐकायला मिळे. मात्र हल्ली ऑनलाइन् म्याट्रिमोनीज् चे दिवस आल्यापासून हे चित्र आजकालच्या वधूंसारखेच काहीसे बदलू लागले आहे. पादत्राणांचा उपयोग फोटोत दिसणारी आपली उंची वाढवण्यासाठी, कोणत्या पोशाखावर कोणते चप्पल-बूट म्याच् होतात हा 'ड्रेसिंग् सेन्स्' दाखविण्यासाठी, आणि झालेच तर लग्नानंतर नवरा व बायको यांच्यापैकी कोणाच्या पायात किती त्राण उरणार नि कुणाचे किती संपणार, हे दाखविण्यासाठी केला जाऊ लागला आहे. एकंदरीतच चप्पल-बुटांमधील फ्याशनसंबंधी कमी पर्याय उपलब्ध असल्याने हा प्रकार वरांपेक्षा वधूंच्या बाबतीतच जास्त होतो, असे आमचे निरीक्षण आहे. गर्दीत पर्स किंवा गळ्यातली सोनसाखळी चोरणारा भुरटा चोर, विनाकारण मागे लागणारा रोड् रोमिओ किंवा नवखा, अननुभवी प्रेमवीर यांना प्रसाद म्हणून चढवायलाही आजकालच्या मुली पादत्राणांचा वापर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता 'जुळले मनामनाचे नाते तुझे नि माझे' या ऐवजी 'जुळले बुटाबुटाचे नाडे तुझे नि माझे'; 'फुलले रे क्षण माऽझे फुलले रे' ऐवजी 'झिजले रे बुट माऽझे झिजले रे' अशी मंगलगीते कधी ऐकायला मिळणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत. अशा बहुपयोगी उपलब्धीचे महत्त्व पटल्यामुळेच सारसबागेतला गणपती, अरण्येश्वर, पर्वती अशा ठिकाणांहून पादत्राणांच्या चोर्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचेही ऐकायला मिळते आहे.
आज भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना बूट फेकून आपल्या इराकी मित्राचे अंधानुकरण करण्याचा चावटपणा एका शीख पत्रकाराने केल्याचे पाहण्यात आले. पण मुळातच शीख बाणा हा बुटासारखे तुच्छ हत्यार न वापरता लढवय्या वृत्तीने सीमेवर छातीचे कोट करून बंदुका चालवायचा (किंवा भारतात ट्रक नि अमेरिकेत-क्यानडात टॅक्सी चालवायचा) आहे. त्यामुळे इराकी पत्रकाराच्या बूट फेकण्यातला तो जोश या मा. पत्रकार सरदारजींच्या जोडा हाणण्यात दिसून आला नाही. आणि सदैव हसतमुख नि शांत असणारे आदरणीय गृहमंत्री सुरुवातीला जरी त्या अनपेक्षित प्रीतीसुमनांनी किंचित गांगरल्यासारखे वाटत असले, तरीसुद्धा पाडगावकरांच्या 'जेंव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा' च्या चालीवर 'जेंव्हा तुझ्या बुटांना उडवी दलेर माझा' असे काहीसे त्यांना सुचले असण्याची शक्यता त्यांच्या मिस्किल हसण्यावरून तरी अगदीच नाकारता यायची नाही.
=====================================================================================

प्रस्तुत लेखनातून निखळ करमणूक हाच एकमेव उद्देश आहे. जाणतेपणे कुणाच्याही धार्मिक, प्रादेशिक वगैरे प्रकारच्या भावना दुखावण्याचा दुष्ट हेतू मुळीच नाही, याची कृपया नोंद घ्यावी. अजाणतेपणे कुणी दुखावेले गेले असेल, तर उदार मनाने हा लेखनापराध पोटात घालावा, ही कळकळीची नम्र विनंती
=====================================================================================

Thursday, September 27, 2007

... 'परी' हिच्यासम हीच!

"ऐ फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कराना गजब हो गया" हे अख्खं गाणं साधनासाठी चुकूनच लिहिलंय असं मला फार वर्षांपासून वाटत आलं आहे. फार वर्षांपासून म्हणजे, एक - जेव्हा हे गाणं ऐकलं-बघितलं तेव्हापासून, आणि दोन - साधना कोण आणि मधुबाला कोण हे कळायला लागल्यापासून. ज्या वयात मी माधुरीच्या 'एक-दोन-तीन' वर फिदा होऊन स्वतःला अनिल कपूर समजायला सुरुवात केली होती, त्यावेळी बबिता-नंदा, नर्गिस-मीनाकुमारी, साधना-वैजयंतीमाला या जोड्या माझ्यासाठी 'कन्फ्यूजन'चं जिवंत उदाहरण ठरायच्या. पण या सगळ्यांमध्ये आपलं वेगळेपण जाणवून द्यायची, ती एक आणि एकच - मधुबाला. मधुबालाच्या बाबतीत कधीच कन्फ्यूजन झालं नाही आणि तसं होण्याचा चान्सच नव्हता!

टपोरे पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे जिवंत, रसरशीत ओठ, जीव ओवाळून टाकावंसं खळखळणारं हसू, कपाळावर एकाच किंवा दोन्ही बाजूंना मिरवणारं बटेचं अर्धवर्तुळ आणि एकूणच टवटवीत व्यक्तिमत्त्वाच्या मधुबालाने कोणाच्याही मनात घर न केलं तरच नवल! मधुबालाला घडवल्यानंतर देवाने जगात सुंदर स्त्री निर्माण केलीच नाही, या माझ्या ठाम मताला अद्यापही तडा गेलेला नाही. बहुधा तिच्या जन्मानंतर देवानं तो साचाच मोडून टाकला असावा. काय योगायोग आहे पहा, मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारीचा (सन १९३३) - म्हणजे साक्षात व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशीच! या दिवशी एका गुडघ्यावर अर्धवट खाली बसून तिला साधं गुलाबाचं फूल देण्याचाही योग कुणाच्या नशिबात आल होता की नाही कोण जाणे; पण हिनं मात्र उण्यापुर्‍या छत्तीस वर्षांच्या अल्पायुष्यात करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवलं. वयाच्या तेराव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार्‍या मधुबालानं अशोककुमारबरोबर बॉम्बे टॉकिजच्या 'महल' (आयेगा, आयेगा, आयेगा...आयेगा आनेवला...आयेगा...) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दणदणीत पदार्पणाची वर्दी दिली आणि चाहते आणि चित्रपत्रकारिता विश्वाकडून 'वीनस ऑन द स्क्रीन'ची उपाधी मिळवली. अशोककुमारबरोबर 'हावडा ब्रिज', देव आनंद बरोबर 'काला पानी', किशोरकुमारबरोबर 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ तिकीट', भारतभूषण नावाच्या ठोकळ्याबरोबर (!! अरेरे!!) 'फागुन', 'गेटवे ऑफ इन्डिया' आणि 'बरसात की रात' हे तिचे लक्षात राहण्यासारखे काही चित्रपट. माझ्या तर ते एक से एक बढकर गाण्यांमुळे आणि त्यात दिसणार्‍या मधुबालेमुळेच लक्षात राहिलेत. हावडा ब्रिज मध्ये गोड हसून, मान वेळावून "आईयेए ए ए ए ए.......मेहेरबाँ" म्हणणारी मधुबाला कोण कशी विसरेल! चलती का नाम गाडी मध्ये "एक लडकी भिगी भागी सी" मधली साडीचा पदर पिळताना वैतागलेली आणि किशोरकुमारला करारी नजरेने खुन्नस देणारी, "पाँच रुपय्या बारा आना" मध्ये त्याच्याचबरोबर बागडणारी आणि निरागसपणे, अल्लडपणे त्याला "हाल कैसा है जनाब का" विचारणारी खट्याळ 'रेणू' कशी बरं लक्षात राहणार नाही?! गेटवे ऑफ इन्डिया मधली "दो घडी वो जो पास आ बैठे" म्हणणारी शांतस्वभावी, मंद हसणारी मधुबाला, काला पानी मध्ये "अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना" म्हणूण देव आनंदच्या नाकदुर्‍या काढणारी मधुबाला आठवणींच्या पडद्यावरून कशी पुसली जाईल? आणि तिच्या कारकिर्दीचा कळस ठरलेला 'मुघल-ए-आझम' - तो कसा विसरता येईल? "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" म्हणताना लाजून घूंघट उचलणारी पण त्याचबरोबर भर दरबारात षंढ सलीमला त्याच्या(च!) बापासमोर(च!) छातीठोकपणे "जब प्यार किया तो डरना क्या"विचारणारी अनारकली - विसरू शकू आपण तिला? मुळीच नाही!

या सौंदर्यदेवतेचं पडद्यामागचं आयुष्य मात्र बरंचसं इतरांसाठी जगण्यातच गेलं. आधी दिलीपकुमारची (आइच्यान!!!...दिलीपकुमार????? :( ) प्रेयसी म्हणून, मग किशोरकुमारची बायको म्हणून आणि सदान् कदा अताउल्ला खान या 'पठाणाची मुलगी' म्हणून. दिलीपकुमार आणि मधुबालाचा रोमान्स 'ज्वार भट्टा'च्या (सन १९४४) सेट्सवर चालू झाला, 'तराना' (१९५१) च्या वेळी भरात आला. 'नया दौर'च्या वेळेचे शूटिंगचे शेड्यूल दिलीपकुमारने आपल्या मुलीशी रोमान्स करण्यासाठी सोईचे असे बनवून घेतले आहे, या कारणास्तव अताउल्लासाहेबानं विरोध केला आणि मधुबालाची 'नया दौर' मधून हकालपट्टी होऊन वैजयंतीमाला त्यात आली. सायनिंग अमाउन्टच्या वादावरून निर्माते बी आर चोप्रा यांनी मधुबालाला कोर्टात खेचले आणि दिलीपकुमारने तिच्या व अताउल्लांच्या विरोधात शपथपत्र दिले. सहा वर्षांचा रोमान्स सहा मिनिटांपेक्षा कमी वेळात संपला. किशोरशी मात्र तिचा संसार तसा (बर्‍यापैकी) सुरळीत(च) पार पडला (किशोर अगदी रंगेल गडी असूनसुद्धा!) तिच्या हृदयाला भोक असल्याचे निदान होऊन ती लंडनला उपचारांसाठी गेली आणि तिकडून 'केवळ काही दिवसांचीच पाहुणी'चं सर्टिफिकेट घेऊनच आली. तरीही न खचून जाता तिने राज कपूर बरोबर सिनेसृष्टीत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. पण सततच्या आजारपणामुळे तो यशस्वी ठरला नाही. डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का देत लंडनहून आल्यावर मधुबाला ९ वर्षे जगली! ५० च्या दशकात तिच्या हॉलिवूडमधल्या पदार्पणाचेही प्रयत्न चालू झाले होते. 'थिऍटर आर्ट' सारख्या मासिकात तिच्यावर पानभर मोठ्या छायाचित्रासह एक लेखही छापून आला होता. पण तिचे हॉलिवूड पदार्पण तसेच राहून गेले. अन्यथा मर्लिन मन्रो वगैरेंसारख्यांना तिने टफ फाइट दिली असती, यात शंकाच नाही. २३ फेब्रुवारी १९६९ ला, आपला ३६ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर १० दिवसांत मुमताज बेगम जेहान् देह् लवी - अर्थात आपल्या लाडक्या मधुबालाने सगळ्यांचा कायमच निरोप घेतला. गंमत अशी की त्या काळात तिच्यावर जी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही किंवा अयशस्वी झाली, ती सध्या बरीच कॉमन समजली जाते.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला मधुबाला वेगवेगळ्या रूपांत दिसत आली आहे. अगदीच नकळत्या वयात मला ती नेहमीच परीकथांमधली पांढराशुभ्र फ्रॉक घातलेली, पाठीवर दोन पंख आणि हातात जादूची कांडी असलेली परी वाटायची. चलती का नाम गाडी मधली तिची खट्याळ, अल्लड, केसांना दोन रिबिनी बांधलेली निरागस रेणू कॉलेजात जाणार्‍या ताईसारखी वाटली. काला पानी मध्ये ती देवआनंदची प्रेयसी नाही, तर माझी स्वतःची गर्लफ्रेन्ड वाटली. तीच गोष्ट 'मिस्टर एन्ड मिसिज ५५' ची. आणि इतकी सालस आणि सोज्वळ की असे 'बायको मटिरिअल' आईपुढे उभे केले असते, तर तिने हसतहसत, आनंदाने होकार दिला असता ;) मधुबालानंतर माधुरी दिक्षित सोडून इतर कोणातही असा 'कुलीन गृहकर्तव्यदक्षपणा' सापडला नाही, आणि कदाचित सापडायचाही नाही. माधुरीचं मराठमोळेपण कोळणीची चोळी घालून "हमको आजकल है इन्तजार" वर नाचताना जितकं प्रसन्न आणि 'ऑब्विअस' आहे, तितकंच मधुबालाचं निर्मळ, शालीन असणं प्रसन्न आणि स्वाभाविक आहे. मराठमोळी मधुबाला पहायची असेल, तर परकर-पोलकं नेसून आणि काळ्या रिबिनी बांधून केसांच्या दोन वेण्या घातलेली 'नाच रे मोरा अंब्याच्या वनात'वर नाचणारी मधुबाला इमॅजन करा ;) म्हणजे मी काय म्हणतोय, ते ध्यानात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा ती माझ्या लेखनाची प्रेरणा ठरली आहे. भिंतीवरच्या तिच्या भल्यामोठ्या पोस्टरशी संवाद साधताना अस्वस्थ शब्दांना प्रसन्नतेकडे जाण्यासाठीचं तिकीट मधुबालानं फाडावं; तिला कुर्निसात करूनच शब्दन् शब्द कागदावर उतरावा, आणि भानावर यायच्या आत एखादी कविता किंवा गझल तिकडे अवतीर्ण व्हावी; केवळ शब्दांनाच नव्हे, तर मनालाही उभारी यावी, आणि या देवतेला मनोमन मानाचा मुजरा करून आपण एक 'फ्रेश' सुरुवात करायला घ्यावी, यापेक्षा अधिक समर्थ प्रेरणा दुसरी काय असेल? पडद्यावरचा तिचा सफाईदार वावर, कधी लडिवाळ, कधी करारी तर कधी धीरगंभीर, अश्रूपूर्ण डोळ्यांनी आणि कमनीय भिवयांनी बोललेले लाखो संवाद आणि गालावरच्या खळीतून उधळलेले आनंदाचे कित्येक क्षण कैक लोकांच्या आयुषातले हजारो सेकंद उजागर करून गेले असणार, यात शंकाच नाही. मधुबाला 'हॉट' नव्हती, सुंदर होती. शी वाज नॉट 'हॉर्नी', शी वाज ब्यूटिफुल. ती केवळ नावापुरती नाही, तर लौकिकार्थानं 'वीनस ऑन द स्क्रीन' होती, 'गॉडेस्' होती याबाबत दुमत नसावे. मधुबाला हे फक्त एक व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, वाद, गॉसिप्स, झगमगाट नाही; ते एक चिंतन आहे, समाधी आहे, असं मला वाटतं. आणि अशी समाधी लागली की मी नेहमीच म्हणतो -
दो घडी वो जो पास आ बैठे, हम जमाने से दूर जा बैठे...

...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...


लेखातील चित्रपटविषयक व इतर माहितीपूर्ण संदर्भः विकिपिडिया
छायाचित्रांचे सौजन्यः गूगल इमेज सर्च

Friday, July 13, 2007

रॅट-अ-टुइ



आपल्याकडे संजीव कपूरच्या पुस्तकांमधून पाककृती वाचून नानाविध प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या यादीत रेमी नावाचा एखादा उंदीरसुद्धा सामील झाला, तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? जास्त विचार करू नकात. तुमच्यासमोर हे कल्पनाविश्व 'रॅट-अ-टुइ' नावाच्या एका दे-धमाल चित्रपटातून वॉल्ट डिस्ने पिक्चर्स-पिक्सार यांच्या संयुक्त विद्यमाने उभे करण्यात आले आहे. अकादमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक ब्रॅड बर्ड आणि 'कार्स','फ़ाइंडिंग निमो' सारख्या चलतचित्रपटांचे निर्माते पिक्सार ऍनिमेशन्स हे या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र काअम करताना दिसणार आहेत.
गुस्तॉव्ह नावाच्या फ़्रान्समधील संजीव कपूरचे दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि त्याच्या पाककृतींचे पुस्तक यांवरून पदार्थ 'चवीने' खाण्यात आणि बनवण्यात रुची निर्माण झालेला रेमी नावाचा उंदीर पाकशास्त्राचा अभ्यास करतो. 'एनीवन कॅन कुक' हा गुस्तॉव्हचा मंत्र हा रेमीच्या आयुष्याचा मंत्र बनलाय. गुस्तॉव्हनेच रेमीला वेगवेगळ्या चवी 'शिकवल्या' आहेत. त्यामुळे समस्त उंदीर ज़मातीत रेमी एक क्रांतिकारी बनलाय. लाडका भाऊ एमिल आणि वडील, मित्रपरिवार यांच्याशी एका अपघाती विरहानंतर रेमी गुस्तॉव्हच्याच बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या पूर्वप्रसिद्ध रेस्तराँ मध्ये शिरतो. पारंपारिक प्रसिद्ध खाद्यपदार्थांची वाट न चोखाळता चायनीज़, मेक्सिकन अशा पदार्थांतून रेस्तराँचा कायापालट करणाचे गुस्तॉव्हचा उज़वा हात असलेल्या स्किनरचे बेत दिवंगत गुस्तॉव्हचा मुलगा लिंग्विनीच्या अनपेक्षित आगमनामुळे उधळले ज़ाण्याच्या बेतात आहेत. आधी पोऱ्या म्हणून भटारखान्यात रुज़ू झालेला लिंग्विनी रेमीच्या करामतींमुळे कोणतेही पाककौशल्य नसतानाही एक अप्रतिम, चवदार सूप बनवतो आणि अल्पावधीतच एक कुशल आचारी म्हणून ओळखला ज़ाऊ लागतो. लिंग्विनीमुळे आपले बेत उधळले ज़ाणार असल्याची तसेच लिंग्विनीकडे कोणतेही पाककौशल्य नसून कोणाच्यातरी 'छुप्या' मदतीने निरनिराळे पदार्थ बनवले ज़ात आहेत, याची ज़ाणीव झाल्यावर स्किनरने या प्रकरणाचा छडा लावायचा निश्चय केलाय; ज्याने लिहिलेल्या प्रतिकूल समीक्षेच्या धक्क्याने गुस्तॉव्ह मरण पावला, तो एगो नामक पाकसमीक्षक लिंग्विनीवरही डोळा ठेवून आहे; एकीकडे भाऊ, वडील, मित्रपरिवार आणि दुसरीकडे गुस्तॉव्हचा मूलमंत्र आणि सदैव बरोबर असलेले त्याचे आभासी अस्तित्त्व (त्याला 'भूत' म्हणवत नाही) अशा द्विधा मन:स्थितीत रेमी सापडलाय; भटारखान्यातलीच एक उत्तम आचारी असलेल्या कॉलेटच्या प्रेमात लिंग्विनी अडकलाय, हे रेमीला कळलंय, त्याला ते प्रेम सफल व्हावंसं वाटतंय पण त्याला एगो आणि स्किनर दोघांशी भिडायचंयसुद्धा! तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही, इतक्या विविधांगी कल्पना आणि मानवी भावनांचे चित्रण रेमी, एमिल,लिंग्विनी,कॉलेट, स्किनर, एगो यांच्यापासून रेस्तराँमधील ग्राहक, भटारखान्यातील इतर कर्मचारीवर्ग, रस्त्यावरचे लोक, पशुपक्षी यासारख्या बारीकसारीक गोष्टी या सगळ्यांमधून करण्यात आले आहे. रेमी आणि लिंग्विनीची अपघातानेच झालेली मैत्री, रेमीच्या वडिलांचे त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न, एमिल आणि रेमीचे अपघाती पुनर्मिलन, स्किनरशी दुष्मनी, कॉलेट आणि लिंग्विनीचं प्रेम, रेमीने बाबांना ऐकवलेलं 'चेन्ज इज़ नेचर' हे वाक्य, समस्त उंदीरमित्रांनी स्किनरची खाद्यपदार्थांच्या गोदामात बांधलेली मुटकुळी हे सगळंच प्रेक्षणीय आणि कौतुकास्पद! मनापासून दाद देण्याज़ोगं! रेमीच्या साथीने आणि प्रमुख सहभागाने बनवलेली 'रॅट-अ-टुइ' खाऊन एगोला आठवलेली स्वत:च्या आईच्या हातची चव आणि त्याच्या डोळ्यांत तरळलेलं पाणी हा चित्रपटाचा 'डिफ़ायनिंग सीन'!
भिवया आणि डोळ्यांच्या कल्पक हालचाली आणि त्यातून जिवंत झालेली पात्रं हे डिस्नेच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य या चित्रपटातही ठळकपणे ज़ाणवतं. आनंदित रेमी, रात्रीचे झगमगीत पॅरीस पाहून भारावलेला रेमी, घाबरलेला रेमी जितक्या कल्पकतेने रंगवलाय, तितक्याच कल्पकतेने त्याचे टवटवीत, उभारलेले कान गळपटवून आणि भिवया कपाळाच्या मध्यभागी एकवटवून 'तो निराश आहे' हे दाखवलंय. आळशी, बावळट लिंग्विनी, कॉलेटचे चुंबन घेऊन चक्रावलेला लिंग्विनी, 'टॉमबॉय' कॉलेट आणि लिंग्विनीवर रागावून मग रडणारी कॉलेट - एकूण एक पात्रे प्रेमात पडावीत अशी आहेत. चित्रपटाचा नायक रेमी हा तर टॉम ऍंन्ड जेरीमधल्या जेरीनंतर नंबर दोनचा 'क्यूट' उंदीर असावा; कदाचित मिकी माउसपेक्षाही जास्त. एक 'काहीच्या बाही', 'इमॅजन व्हॉटेवर' प्रकारची गोष्ट असली, तरीही तर्कसुसंगत आहे. कोठेही विस्कळीत झालेली नाही. 'लिंक तुटली' हा प्रकार कोठेही बघायला मिळत नाही. प्रसंगानुरूप श्रवणीय पार्श्वसंगीत आणि त्याला अनुकूल असा रंगीबेरंगी बॅकड्रॉप ही डिस्नेची खासियत प्रत्येक फ़्रेममधून ज़ाणवते. रंगसंगतीही प्रसंगानुरूप आणि भावानुरूप. पात्रांना त्यांचे वय, स्वभाव आणि कथानकातील भूमिका यांच्या अनुसारच आवाज़ देण्यात आले आहेत; आणि ते देताना फ़्रेंच उच्चारांकडे कटाक्षाने लक्ष पुरवण्यात आले आहे. अंधाऱ्या गोदामाचा दरवाज़ा उघडल्यानंतर आत येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग, त्यानुसार होणारी सावल्यांची हालचाल, विविध प्रकारच्या भाज्या ठराविक पद्धतीने कापण्याचे आचाऱ्यांचे कौशल्य हे बारकावेही अचूकपणे टिपण्यात आले आहेत. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स (आपण पात्राकडे/वस्तूकडे/दृश्याकडे वरच्या दिशेने तिरकस पाहत आहोत, असे मानून त्या वस्तू/पात्राचे/दृश्याचे केलेले चित्रण), 'ओवर द शोल्डर्स' शॉट्स (मुख्य पात्रावर एखाद्या दुय्यम वस्तू अगर पात्राच्या आडून केंद्रित केलेला कॅमेरा आणि टिपलेल्या हालचाली) अशा उत्कृष्ट चित्रणकौशल्याची ज़ोड मिळाल्यानंतर चित्रपट प्रेक्षणीय आणि खासम् खास झाला नाही तरच नवल. आणि चित्रपट आणखी छान करायचा म्हटला तर तो फ़ोर-डी करता येईल (तो 'छोटा चेतन' बघताना लावलेला काळा गॉगल म्हणजे थ्री-डी आणि त्याच्या ज़ोडीला तुमची सीट हादरवणारे, तिची उंची अलगद कमीजास्त करून नि कार्पेट सळसळवून किंवा तत्सम पद्धतीने तुम्ही स्वत: पडद्यावरील घटनांमध्ये सामील आहात, असा भास निर्माण करणे म्हणजे फ़ोर-डी) पण दोन-एक तासांच्या चित्रपटासाठी असे आभास निर्माण करणे आव्हानात्मक आणि कदाचित आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या, कथानकाच्या दृष्टिकोनातून 'फ़िज़ीबल' (मराठी प्रतिशब्द? नकोच!) नसावे.
भारतात हा चित्रपट आहे त्या स्वरूपात पहायला मिळाल्यास उत्तम! नाहीतर रेमीचे 'रामू' करून नि हास्यास्पद भाषांतरे करून उत्तम चित्रपटांना गालबोट लावण्याची परंपरा कायम राखली ज़ाण्याचीच शक्यता जास्त. मात्र असा उत्तम चित्रपट प्रत्येक लहान मुलापर्यंत सर्वदूर पोचवण्याचे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे चित्रपट वितरकांचे प्रामाणिक प्रयत्न असतील, तर निदान पात्रांच्या नावांशी आणि संवादांशी झालेली तडज़ोड सहन करण्याचीही तयारी ठेवणे श्रेयस्कर.
एकुणातच, लहानांबरोबरच मोठ्यांनीही मनमोकळेपणाने आनंद लुटावा, असा मस्त चित्रपट!

अधिक माहितीसाठी: रॅट-अ-टुइ

Tuesday, July 03, 2007

एका पदवीदान समारंभाची गोष्ट

मे २००५ मध्ये मला अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर ती काळी की गोरी हे सुद्धा पहायला मिळाले नव्हते. मुंबई विद्यापिठाचा पदवीदान समारंभ डिसेंबर २००५ मध्ये पार पडला आणि तेव्हा अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण २५% पूर्ण झाले होते. त्यामुळे काळा डगला, डोक्यावर ती चौकोनी टोपी आणि हातात पदवीचे भेंडोळे अशा अवतारातला फोटो काढून मिरवायची संधी कधी मिळते, याकडे लक्ष लागून राहिलेले. साधारण दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेतील माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन 'मास्टर ऑफ़ कंप्यूटर सायन्स' ही पदवी मिळाली आणि ते स्वप्न साकार झाले. आईबाबांना समारंभाचे आमंत्रण पाठवून, त्यांचे व्हिज़ाचे सोपस्कार उरकून त्यांनी इकडे येण्यासाठी विमानात पाय ठेवेस्तोवर पदवीदान समारंभ अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला होता. त्यांचे तिकीट दोन वेळा बदलणे, प्रवासाची तयारी, औषधे या सगळ्यात मी अमेरिकेत असून आणि परीक्षा चालू असूनही अडकलोच होतो. आयुष्यात पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास करून येण्याचा तणाव, लेकाच्या भेटीची तळमळ या सगळ्यात अनावश्यक सामानाचा व्यत्यय नको म्हणून त्यांची बॅगही मुंबई-पुणे प्रवासातल्या सामानासारखी भलतीच आटोपशीर झाली होती. आईबाबा येणार आणि आपले कौतुक करणार, शाबासकी देणार याची उत्सुकता लागून राहिली असल्याने तीन दिवसही खूप मोठा काळ वाटत होता. अमेरिकेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मातापित्याचे स्वागत करायला हा गडी साधारण दोन-एक तासांचा प्रवास करून डेट्रॉइटला ज़ायचा होता; पण ऐन वेळी खराब हवामानामुळे अस्मादिकांचे विमान त्यांच्या नंतर पोचले आणि मी माझ्या आईबाबांचे स्वागत करण्याऐवजी त्यांनीच माझे स्वागत केले. मीराताईंच्या चिरंजिवांच्या पदवीदान समारंभाबाबतचे लेखन वाचल्यानंतर तर खराब हवामान आणि पदवीदान यांचे जन्मजात वैर असावे, असेच वाटून गेले. विमानात मिळालेली काळीकुट्ट, दूध-साखर नसलेली कॉफ़ी आणि एका मुज़ोर हवाईसुंदरीबद्दलची तक्रारसुद्धा आई ज्या कौतुकाने सांगत होती, ते पाहिल्यावर माझ्या उच्च शिक्षणाचे आणि तिच्या डोळ्यांत तरळलेल्या आनंदाश्रूंचे चीज़ झाल्याचे वाटले.
डेट्रॉइटला माझ्या मावसबहिणीकडे दोन दिवस घालवून आम्ही आमच्या गावी समारंभाच्या आदल्या दिवशी परतलो. आईबाबांच्या लग्नाचा आणि आईचा असे लागोपाठच्या दिवशीचे दोन्ही वाढदिवस त्यांना विमानात झोपा काढून साज़रे करायला लागल्याने आम्ही डेट्रॉइटलाच एक छोटीशी पार्टी उरकून घेतली. पदवीदान समारंभाच्या दिवशी माझ्यापेक्षा जास्त उत्साहाने आईबाबाच तयार होत होते. बाबांचा कडक इस्त्रीचा सफारी, आईची शिफ़ॉन साडी आणि मॅचिंग ब्लाउज़ आधीच ठरले असल्याने त्यांना तयार व्हायला मुळीच वेळ लागला नाही. मात्र कोणता शर्ट, कोणता टाय हे ठरवताना मात्र माझी बरीच पर्म्युटेशन्स-कॉंबिनेशन्स चालू होती. अखेर मनासारखा नट्टापट्टा झाल्यावर आम्ही घरून निघालो तेव्हा पदवीदान समारंभ अवघ्या १५ मिनिटांवर येऊन ठेपला होता. आईबाबांबरोबरच सुपरिचित मनोगती विनायककाका आणि रोहिणीकाकू, माझे मित्रमैत्रिणी, खोलीमित्र (रूममेटस) आमच्याबरोबर. त्यातच माझे दोन रूममेटसही माझ्याबरोबर ग्रॅज्युएट होणार आणि त्यातल्या एकाचे कुटंब त्याच्याबरोबर. एकूणच मोठा लवाज़मा होता.
संपूर्ण विद्यापिठाचा पदवीदान समारंभ खूप मोठा, धडाकेबाज़ काहीसा नखरेल पण तरीही हवाहवासा. प्रॉव्हिडन्स बॅप्टिस्ट चर्चमध्ये झालेला आमच्या संगणकशास्त्र विभागाचा पदवीदान समारंभ मात्र सुनियोजित आणि आटोपशीर. मोज़की पण मोलाची भाषणे, विचारांची देवाणघेवाण आणि मग पदव्या प्रदान करण्याचा सोहळा आटोपून बाहेर पडेस्तोवर साधारण तीन तास उलटून गेले होते. छायाचित्रे काढणे, मास्तरांना भेटणे, आईबाबांच्या सगळ्यांशी औपचारीक ओळखी, गप्पाटप्पा, हास्यविनोद यांत पोटात कावळे ओरडायला लागल्याची ज़ाणीव झाली नव्हती; पण 'बिर्याणी हाउस'च्या दारातून आत शिरल्यावर मात्र गप्पांपेक्षा अधिक - खाण्यासाठी - तोंड चालू लागले. जेवण आटोपून आणि नंतरच्या गावजेवणासाठीची आवश्यक खरेदी करून घरी गेलो तेव्हा संध्याकाळचे सात वाज़ून गेले होते. विनायककाका आणि रोहिणीकाकूंना त्यांच्या गावी वेळेत पोचणे आवश्यक असल्याने गरमागरम चहा झाल्यावर त्यांनी आमचा निरोप घेतला. रात्रीच्या जेवणासाठी त्यांना थांबता आले असते तर काकूंच्या हातची कोणती डिश चाखायला मिळाली असती, हे स्वप्नरंजन मी आज़ही अधूनमधून करत असतो
अमेरिकेतील विद्यार्थी समुदायामध्ये आपल्यातल्याच कोणाचीतरी आई आल्याचा आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असतो. आणि त्या आनंदाचा चवदार मोठेपणा हा दरदिवशी एक पदार्थ या हिशेबाने साठ-एक बटाटेवडे, तितक्याच इडल्या, चार किलो चिकन, कोलंबीभात आणि सोलकढी, पावभाजी, झुणकाभाकर नि चटणी, पराठे, थालिपिठे, पोहे नि उपमा, छोले/मटार उसळ, नानाविध भाज्या आणि मुख्य म्हणजे गरमागरम, तूप लावलेल्या पोळ्या यांच्या डिशच्या डिश काही मिनिटातच संपायला लागल्या की ठळकपणे ज़ाणवतो. एरव्ही अमेरिकेत असताना पोळी-भाजी, आमटीभात आणि बाज़ूला आंबा किंवा मिरचीचे लोणचे, पापड/तळलेली मिरची/सांडगे किंवा कोशिंबीर यांपैकी काहीतरी असा चौरस आहार दिवसातून दोन वेळा सोडाच पण दोन महिन्यांतून एकदा मिळण्याचेही सुख नाही फक्त काही दिवसच मिळालेल्या या सुखाने आम्हां सगळ्यांचे आमच्याआमच्या 'लोडशेडिंग'चे बेत एकहाती उधळून लावले; पण त्या पंधरा-सोळा मुखांनी प्रत्येक डिश चाटूनपुसून खाताना दिलेला ढेकररूपी दुवा ही माझ्या आईबाबांसाठी पुत्रविरहावरची दवा ठरणार यात मुळीच शंका नाही. आमेन!!!

समारंभाची छायाचित्रे येथे पाहता येतील.

Wednesday, April 04, 2007

शब्दसाधना

मनोगत या संकेतस्थळावर श्री. द्वारकानाथ कलंत्री यांनी शब्दसाधना नावाचा एक चांगला प्रयोग चालवला आहे. व्यवहारातील, शास्त्रीय शिक्षणातील अनेक प्रचलित बिगर-मराठी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द शोधणे/तयार करणे असे या प्रयोगाचे स्वरूप आहे. प्रस्तुत शब्दसाधना एक 'प्रयोग' म्हणून निश्चितच स्तुत्य आहे. प्रयोगातून काय साध्य होणार आहे, माहीत नाही. पण 'करून पहायला काय हरकत आहे' या भूमिकेतून करण्यास हरकत नसावी. एडिसनच्या बाबतीत असे ऐकले आहे की फ़िलामेंट म्हणून १२०० विविध वस्तू अयशस्वीपणे वापरून झाल्यानंतर तो म्हणाला की "या १२०० वस्तू फ़िलामेंट म्हणून वापरता येणार नाही, हे तरी मी आता १००% खात्रीने सांगू शकतो". शब्दसाधनेचेही असेच काहीसे असावे असे वाटते. मुद्दा हा आहे, की एडिसनकडे १२०० वस्तू वापरण्याइतकी चिकाटी होती, ती या प्रयोगात असावी. प्रयोगाअंती ज़े गवसेल, त्याचा उपयोग काय आणि/किंवा कसा, ही चर्चा काहीतरी गवसल्यानंतरच करता येईल. प्रस्तुत प्रयोगामागील प्रयोगशीलता, जिज्ञासू वृत्ती आणि धडपड याला सक्रीय पाठिंबा द्यायला निश्चितच आवडेल.
प्रयोगाच्या संभाव्य निकालांचा किंवा त्याच्या अधिक्षेत्राचा सखोल विचार केल्यावर, शास्त्रीय लेखन, संशोधन आणि अभ्यास या क्षेत्राकडून या प्रयोगाला तसेच त्याच्या निकालाला मिळणारी मान्यता याबाबत मी पूर्णपणे साशंक आहे. नवनवीन आणि कदाचित शुद्ध मराठी शब्दांमुळे प्रचलित सोप्या आणि कदाचित अमराठी शब्दांद्वारे चालू असलेल्या अभ्यासाला,संशोधनाला प्राप्त होणारे अतिक्लिष्ट रूप निश्चितच मान्यताप्राप्त आणि उपयुक्त नाही. ऑपरेटिंग सिस्टमचा अभ्यास करताना थ्रेडसना 'धागा', प्रोसेसेसना 'प्रक्रिया' असे संभाव्य शब्द योजणे (मराठीच्या दुराग्रहापायी हे आणि असे शब्द इतरत्र पाहण्यात आले आहेत) हे त्यांच्यातला 'शास्त्रीय'पणा किंवा त्यांमागे दडलेला शास्त्रीय अर्थ यांसाठी निश्चितच मारक आहे. त्यातून ज़वळपास सारखेच भासणारे शास्त्रीय शब्द त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे शास्त्रीय संदर्भांत वेगळे असतात. ही सूक्ष्म अर्थभिन्नता (subtle differences) पर्यायी मराठी शब्दांच्या माध्यमातून समाविष्ट केली ज़ाईलच असे नाही. उदाहरणार्थ डेटाबेस आणि डेटा वेअरहाउस. डेटाबेस म्हणजे विदागार. मग डेटा वेअरहाउस म्हणजे काय? डेटाबेस क्रॅश झाला म्हणजे विदागार कोसळले. पण 'कोसळणे' या क्रियापदाला अपेक्षित असलेला 'डोलारा', 'उत्तुंग बहुमज़ली इमारत', आशाअपेक्षा, स्वप्नांचे बंगले यांपैकी त्या बिचाऱ्या विदागारात काहीच नाही. त्यातून शास्त्रीय संशोधन हे केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच अर्यादित नाही; ते जगभर चालू असते. शास्त्रीय ज्ञानाची वैश्विक देवाणघेवाण होत असते. उद्या अशाच एका जागतिक परिसंवादात अमेरिकन, चिनी, जपानी, युरोपीय संशोधकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना डेटाबेससाठी 'विदागार'चा हट्ट धरणे यात काही समंजसपणा दिसत नाही. शास्त्रीय शिक्षणाच्या क्षेत्रात तरी शब्दसाधनेच्या संभाव्य निकालांचा आवाका इयत्ता दहावीच्य पठ्यपुस्तकांच्या पुढे ज़ाईलसे दिसत नाही, आणि तसा ज़ाऊही नये! मूलभूत शास्त्रीय शिक्षणातून अशा योग्य शब्दांची ओळख होणे स्पृहणीय आहे, पण या पायाभूत शिक्षणाद्वारे एकदा उच्च शिक्षणाचे दरवाज़े खुले खाले, की मराठमोळ्या शास्त्रीय शब्दांचे महत्त्व 'अँटिक पीस'पेक्षा फार वेगळे असेल, असे मला वाटत नाही. विमान आकाशात उडवायलाच आणि उडायला लागेपर्यंतच लाँचपॅड आवश्यक असते ऍट्रिअम आणि व्हेंट्रिकलसाठी अलिंद आणि नीलय माहीत असावे; पण माहीतच असावे.
प्रादेशिक संपर्क आणि प्रसार माध्यमे, दृक् श्राव्य माध्यमे (ज़से बातम्या इ.), व्यासपिठावरील मराठी या क्षेत्रांमध्ये शब्दसाधनेच्या माध्यमातून अपेक्षित सुधारणा निश्चितच घडवता येतील. मात्र चित्रपट, मालिका इत्यादींमध्ये - जे साहित्यिक किंवा लिखित मराठीपेक्षा दैनंदिन जीवन, व्यापारउदीम, शास्त्रीय/राजकीय/सर्वसामान्य आणि सर्वमान्य सामाजिक कल्पना यांचे प्रतिबिंब आहेत; ज्यातून 'बोलले' ज़ाते, संवाद साधला ज़ातो - या साधनेच्या निकालाबरहुकूम नवीन (योग्य?) शब्दांचा भरणा झाला, तर त्याला मान्यता मिळणे नाही. साधेसोपे शब्द सापडले, ते ज़र सद्य शब्दांची क्लिष्टता कमी करत असतील, तरच त्यांना मान्यता मिळावी. पण बोली मराठी, शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रामधील डेटाबेससारख्या शब्दांमधला सोपेपणा विदागारसारख्या शब्दांतून आणखी सुधारेल, असे म्हणणे मला पटत नाही. किंबहुना त्यामुळे क्लिष्टता वाढते. उद्या माझ्या बंगाली मैत्रिणीला 'चल चित्रपट देखने जाते है' म्हटले (चित्रपट हा हिंदी शब्दही आहे आणि आम्हा दोघांची संवाद साधण्याची सामाईक भाषा हिंदी किंवा इंग्रजी आहे, हे गृहीत धरून), तर संपलेच! भिन्न संस्कृती, भाषा, आचारविचार यांची सरमिसळ आपल्याच समृद्धीसाठी उपयुक्त ठरत असेल, तर आपलेच पाय ओढण्याचा पारंपारीक मराठी बाणा काय कामाचा? मराठी भाषा प्राचीन काळापासून आज़तागायत कित्येक अमराठी शब्दांच्या समावेशातूनही समृद्धच होत आली आहे, आणि राहीलही. त्यामुळे अमराठी शब्दांच्या समावेशातून तिच्या अस्तित्त्वाबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. त्याचबरोबर शब्दसाधनेच्या प्रयोगाला तात्त्विक विरोध असणाऱ्यांच्या मराठिविषयीच्या प्रेमाबाबत शंका घेण्याचेही कारण नाही. इंग्रज़ाळलेली व्यापारी मराठी वर्तमानपत्रे, बातमीपत्रे, सरकारी दप्तरे, लिखित साहित्य इत्यादींमधील अपेक्षित सुधारणा हे या साधेनेचे उद्दिष्ट असलेच पाहिज़े, त्याबाबत हट्ट ज़रूर असावा; पण दैनंदिन व्यवहार आणि शास्त्रीय शिक्षण या क्षेत्रांमध्ये अशा शब्दांचा प्रवेश ही घुसखोरी किंवा अतिक्रमण ठरू शकेल आणि हट्टाला दुराग्रहाचे किंवा अतिरेकाचे स्वरूप प्राप्त होईल, ज़े निश्चितच अपेक्षित नसावे. प्रयोगाचे अपेक्षित अधिक्षेत्र निश्चित करून ही धडपड पुढे रेटली, तर उत्तम!
तेव्हा हा प्रयोग यापुढे या निश्चित मर्यादित उद्दिष्टांसह पुढे नेल्यास आनंद होईल. शब्दसधनेत याआधीही काही वेळा सहभागी होतो, पुढेही राहीन. पण त्याचबरोबर मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही.

Monday, April 02, 2007

मैंने प्यार किया - सुरुवात

प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनाऱ्यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं. वह्यापुस्तकांतून 'आज़ कुठे कधी भेटायचं' ठरवणाऱ्या चिठ्ठ्या पास करणं हे प्रेम असतं; दूधवाला, किराणा सामान, डॉक्टर, इलेक्ट्रिसिटी यांची बिलं त्या त्या पाकिटात भरून ठेवताना चुकणारे हिशेब आणि त्यावरून ऐकू येणारे 'तू म्हणजे ना डोक्याला ताप आहेस नुसता/ती!', हे प्रेम असतं; आणि ज्या भावलीसाठी आजीकडून स्वेटर विणून घेतला, तिच्या डाव्या डोळ्याच्या ज़ागी दिसत असणारं नुसतंच भोक आणि डोक्यावरचे तुरळक केस यांची पर्वा न करता तिला कुशीत घेऊन झोपणं, हे सुद्धा प्रेमच असतं. इतकं विविधांगी प्रेम कसं बरं सेम असू शकेल? मी प्रेम केलंय ते अशा सेम नसलेल्या प्रेमावर.
प्रेम ही संकल्पना, किंवा तिचा आपण लावत असलेला अर्थ, या दोन गोष्टी एकत्र किंवा आळीपाळीने स्थलकालपरत्त्वेच नव्हे तर वयपरत्त्वेही बदलत असतात, असं माझं ठाम मत आहे. मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडलो, तेव्हा भातुकली खेळणाऱ्या माझ्या बालमैत्रिणीच्या प्रेमात पडलो होतो; भातुकली खेळताना ती ज्या रिअल लाइफ़ 'सांसारीक' सिच्युएशन्स तयार करायची, त्यांच्या प्रेमात पडलो होतो; की भातुकलीसाठी तिच्या घरून मिळणाऱ्या 'पेप्पी' आणि 'अंकल चिप्स'च्या प्रेमात पडलो होतो, हे सांगणं कठीण आहे. आमच्याच काही मित्रमैत्रिणींची त्या 'अंकल चिप्स'सारखीच कुरकुरीत प्रेमं (प्रेम या शब्दाचं अनेकवचन काय आहे हो?) आम्ही आज़ही एन्जॉय करतो. तेव्हा आम्हा दोघांची एक प्रतिक्रिया नेहमीच असते - "आपलं 'लफ़डं' कधी झालंच नाही!" पोरं कसली दिवटी आहेत, याची ज़ाणीव आमच्याआमच्या आईबाबांना वेळीच झाल्याने भातुकलीमधले आमचे 'आई-बाबा' हे रोल्स 'ताई-दादा' मध्ये बदलणे, हे असं लफ़डं न होण्याचं कारण असावं. लफ़डं हे 'प्रेम इन इटसेल्फ़' आहे, असं मला नेहमीच वाटत आलंय. प्रेमाची खुमारी लफ़ड्यात अनुभवायला मिळण्याचं भाग्य फार कमीज़णांच्या नशिबात असतं. तुमचंआमचं लफ़डं सलमान-कतरीनाच्या लफ़ड्यासारखं स्टारडस्ट किंवा चित्रलेखाच्या मुखपृष्ठावर झळकणारं, झगझगीत नसलं तरी किमान आईबाबांपासून चोरून ठेवण्यासारखं, मित्रमैत्रिणींच्या कौतुकाचा आणि वाती वळताना साठेमामींच्या जिव्हाळ्याचा विषय ठरू शकणारं नक्कीच असतं. मराठीच्या पुस्तकातली बालकवींची 'पारवा' तोंडी परीक्षेला आहे, हे माहीत असूनही पाठ नसते, आणि करताही येत नाही. पण परदेसमधलं 'दो दिल मिल रहे हैं' अथपासून इतिपर्यंत मुखोद्गत व्हायला अजिबात कष्ट पडत नाहीत. क्लास बंक करून प्लाझाला पिक्चर बघायचा. मग बिल्डिंगखाली आल्यावर आधी वर कोणी ज़ायचं आणि मग अर्ध्या तासाने कोणी ज़ायचं याचं प्लानिंग करायचं. झालंच तर गणपतीच्या मखराची सज़ावट करताना, तिची किंवा त्याची आयडिया कितीही आवडली, तरी मुळीच पाठिंबा न देता इतरांवर त्याचा निर्णय सोपवून, 'मी डावा गाल खाज़वला म्हणजे मला तुझी आयडिया आवडली', हे प्लान करायचं. किती ही सृजनशीलता! प्रेमात पडल्यावर काय काय पापड लाटावे लागतात, हे त्या बिचाऱ्या प्रेमवीरांनाच ठाऊक असतं. आणि त्यांच्या या धाडसाला 'लफ़डं' म्हणून सारी दुनिया या प्रेमाला एक नकारात्मक छटा देऊन टाकते. अशा कित्येक लफ़ड्यांवर मी मनापासून प्रेम केलंय - स्वत:ची नसली तरी!
'बाज़ारात दालचावलचे भाव काय आहेत', किंवा 'प्रेम कशाशी खातात कळतं का तुला' वगैरे घिसेपिटे प्रश्न प्रेमात तहानभूक हरवलेल्यांना कसे हो पडणार? आपल्या जानेमनला शाहरूख 'जाम म्हणजे जाम' इतका (कदाचित आपल्यापेक्षाही जास्त!) आवडतो, हे माहीत असलं की 'कुछ कुछ होता है' बघताना तिकिटावर किती उडाले की उडवले, याचा विचार करायचा नाही, हे त्यांना कळतं. त्याचबरोबर जिप्सीतली पावभाजी या महिन्याच्या उरलेल्या पॉकेटमनीत बसणार नाही, हे सुद्धा त्यांना नक्कीच माहीत असतं. त्याला आवडतो म्हणून मी माझा मोरपिशी पंजाबी घालायचा नि त्यावर काळी ओढणी घ्यायची; आणि तिला आवडत नाही म्हणून मी पर्पल लूज़र घालायचा नाही, हे त्यांना कळतं. पहिल्या मज़ल्यावरून ती बघते आहे म्हणून चौकात क्रिकेट खेळताना आपली विकेट ज़ाऊ द्यायची नाही हा त्याचा निर्धार असतो - बॉल मांड्यांवर ज़बरी शेकत असला तरी! आणि वर्गात बसून असाइनमेंट पूर्ण करत असला, तरी त्याचं लक्ष नाटकाच्या तालमीत आहे, हे माहीत असल्याने डायलॉग विसरायचा नाही, याकडे तीही कटाक्षाने लक्ष देते. शाळाकॉलेजातून बाहेर पडल्यावर नोकऱ्या केल्या, गाठीशी चार पैसे ज़मायला लागले, आणि घरच्यांनी स्थळं बघायला सुरुवात केली, की घरी सांगायचं हा बेत तर कितीतरी आधीपासून तयार असतो. नव्या ज़मान्यातले साहित्यविश्वातले कित्येक अनामिक कवी हे प्रेमाचीच देणगी आहेत. चार ओळी असोत किंवा चाळीस; छंदात असो वा नसो, गझल असो की मुक्तक की चारोळी; पण ते कविता करतात आणि स्वतःला व्यक्त करतात. सुरात गाता येत नसलं तरीही ऑर्केस्ट्रा ऑडिशन्ससाठी किंवा अभिनयाचं अंग नसतानाही नाटकासाठी नाव देतात. असं अचूक प्लानिंग, असंख्य तडज़ोडी शिकवणारं प्रेम, काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःचं वेगळं अस्तित्त्व निर्माण करण्याची ऊर्मी ज़ागवणारं प्रेम, असंख्य कवितांमधून व्यक्त होणारं प्रेम - या प्रेमावर मी प्रेम केलंय. डाळतांदळाचे भाव आणि गझलेचं व्याकरण माहीत असूनही!
कधीकधी नकोसं वाटतं असं प्रेम करणं. जेव्हा कुणी अमृता देशपांडे, रिंकू पाटील जिवंत ज़ाळली ज़ाते. जेव्हा आपण हृतिक रोशनसारखे दिसत नाही किंवा आपल्याकडे होंडा सिविक नाही, हे कोणालातरी कळतं. आमच्या वयात वर्षाचं अंतर आहे; ती जैन आहे, मी कोकणस्थ चित्पावन आहे आणि आम्ही पुढे गेलोच तर नक्की कोणालातरी हार्ट ऍटॅक येणार, याची ज़ाणीव होते. तिचे बाबा लार्सन ऍंड टूब्रोमध्ये जी एम आहेत आणि माझे बाबा मंत्रालयात हेडक्लार्क, हे लक्षात येतं. आधीचं गुलाबी लफ़डं नुसतं लफ़डं राहत नाही, तर त्याचं 'सॉलिड प्रकरण' बनतं, कधीकधी दारावर पोलीसही येतात. मोरपिशी पंजाबी घालावासा वाटत नाही की जिप्सीत ज़ावंसंही वाटत नाही. क्रिकेट खेळताना क्लीन बोल्ड होऊनही फरक पडत नाही. मग एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करत प्रेमवीर आपापल्या रस्त्याने चालू पडतात. पण प्रेमाची अनुभूती घेऊन आणि त्या अनुषंगाने मिळणारे 'लाइफ़ मॅनेजमेंट'चे धडे घेऊनच.
इतक्या गहन आणि सर्वांगसुंदर विषयावर सर्वसमावेशक धडी देणारा मी कोणी 'लव्ह गुरु' नाही. पण ढोबळमानाने या प्रेमाचे अनेक प्रकार आणि स्वतःला तसेच इतरांना आलेले अनुभव, प्रेमातल्या टिप्स आणि पिटफ़ॉल्सचं प्रामाणिक चित्रण या मालिकेद्वारे करण्याचा प्रयत्न आहे. अनुभवी प्रेमवीरांना यात स्वतःला हुडकता आले, तर आनंदच आहे. आणि होतकरू प्रेमवीरांसाठी ही मालिका अगदी नवनीत गाईड नाही, पण किमान क्विक रेफ़रन्स पॉकेट डिक्शनरी स्वरूपातले मार्गदर्शक ठरले, तरी खूप आहे!

Wednesday, March 07, 2007

ऍडवायज़र <-> बडवायज़र <-> अपार्टमेंट <-> डिपार्टमेंट (३) - अ

सध्या अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये पैशाची अतिशय चणचण भासते आहे, असे सगळीकडे ऐकायला मिळते. त्याला अनुसरूनच, पदव्युत्तर शिक्षणासाठी इकडे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना विद्यापिठाकडूनच आर्थिक मदत मिळण्याचे सुगीचे दिवस आता सरलेत. कोणत्याही ज्ञानशाखेत केवळ 'मास्टर्स' करायचे असेल, तर विद्यापिठाकडे पैसा नाही; मात्र 'डॉक्टरेट' करायची असेल, तर शुल्कमाफ़ी आणि ज़ोडीला अध्यापन अगर संशोधनात प्राध्यापकांना सहाय्य करण्याच्या मोबदल्यात मासिक भत्ता द्यायला ज़वळपास सगळीच विद्यापिठे एका पायावर तयार आहेत. आमचे विद्यापीठही याला अपवाद नाही. मात्र पैसा नसल्याची ओरड करणाऱ्या विद्यापिठांमधील एकेका प्राध्यापकाची विद्यापिठीय जन्मकुंडली (म्हणजे त्यांनी आतापर्यंत विद्यापिठात राहून काय काय संशोधन केले आहे, कुठले कुठले विषय शिकवले आहेत इ.) पाहिली, की त्यात सगळेच शुभग्रह धनलाभाच्या घरात ठाण मांडून बसलेले दिसतात. आणि गंमत म्हणजे या घरात कधीच शनी वक्री किंवा राहूकाल वगैरे प्रकार नसतो!
विद्यापिठात पाय ठेवताक्षणी 'मध्यमवर्गीय' भारतीय विद्यार्थ्याने करावयाची गोष्ट म्हणजे प्राध्यापकांच्या भेटीगाठी घेणे आणि कुणाकडे काही छोटेमोठे संशोधन संबंधित काम असेल, तर ते बिनपगारी करण्याची तयारी दर्शविणे. त्यामागे, पुढेमागे या महाशयांना आपले काम आवडेल, आणि आपल्याला पुढच्या सत्रापासून शुल्कमाफ़ी तसेच मासिक भत्त्याची दिवाळी भेट मिळेल, हे प्राध्यापक महोदय मग आपल्याला प्रबंधलेखनात नि संबंधित संशोधनात मार्गदर्शन करण्यासाठी आपले 'ऍडवायज़र' होतील, अशी भाबडी अपेक्षा! आल्याआल्याच ज्या महाभागाला आपण ओळखतही नाही, त्याच्यावर 'इंप्रेशन' मारायचे म्हणजे काय काय करायला लागते, यासंबंधीचे आवश्यक (?!) मार्गदर्शन इतर सिनिअर मंडळींकडून झालेले असतेच. प्राध्यापकाला आधी पत्र लिहून, त्यासोबत आपला 'रेझ्युमे' ज़ोडून भेटीची वेळ ठरवणे, इथपर्यंत बहुतेक सगळेच विद्यार्थी यशस्वी होतात, आणि भेटीच्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास आधीच प्राध्यापकाच्या कार्यालयाबाहेर येऊन बसतात. २००५ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी सुद्धा असाच एका विद्वानाच्या कार्यालयाबाहेर ताटकळत होतो.
"कम इन छ.. छचछ..क..र..पॅ.. नि.." माझ्याच नावातली शेवटची तीन अक्षरे उच्चारल्याची ज़ाणीव जेव्हा मला झाली, तेव्हा मी आत ज़ायला उठेपर्यंत प्राध्यापकसाहेब स्वतः मला रीतसर आत घेऊन ज़ाण्यासाठी आले होते. त्यांच्याशी हस्तांदोलन करून आत गेलो नि त्यांच्या समोर बसलो. माझी प्राथमिक ओळख वगैरे करून दिल्यानंतर मग मुद्द्याचे बोलणे चालू झाले.
"सो विच ऑफ़ माय प्रॉजेक्टस फ़सिनेट यू द मोस्ट?" या त्यांच्या प्रश्नाला मी पाठ केलेले उत्तर दिले. आदल्या रात्री साहेबांची प्रॉजेक्टस नज़रेखालून घालून त्यांवरची टिपणे तयार करण्यात, त्यांच्याशी संबंधित तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यात मी जी तन्मयता आणि वेळ खर्च केले होते, तेच मी इंजिनिअरींगला असताना तेव्हाच्या अभ्यासात केले असते, तर फ़र्स्ट क्लास ऐवजी डिस्टिंक्शन नक्कीच मिळवले असते.
"बट यू सी धिस प्रॉजेक्ट हॅज़न्ट गॉट एनी फ़ंडस यट! आय हॅव फ़ाइल्ड ए नाइस प्रपोज़ल फ़ॉर इट ऍंन्ड आय ऍम होपिंग टु गेट टु मिलिअन डॉलर्स फ़ॉर इट. बिसाइडस दॅट रेस्ट ऑफ़ माय प्रोजेक्टस आर बिंग हॅन्डल्ड बाय माय पी एच डी स्टुडन्ट्स ऑलरेडी. सो डु यू वॉंट टु वेट फ़ॉर द अप्रूव्हल फ़ॉर धिस वन?"
माझ्या वडिलांच्या चाळीसएक वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यांनी घेतलेल्या पगारांची नि भत्त्यांची बेरीज़सुद्धा दोन मिलिअन डॉलर्स झाली नसती. मी न म्हणण्याचा प्रश्नच नव्हता; पण महाशयांच्या आणखीही अटी होत्याच.
"यू विल ऑल्सो हॅव टु टेक माय कोर्स इन द नेक्स्ट सेमेस्टर ऍंड ऑब्टेन ऍन ए ग्रेड इन इट. बाय द वे शी इज़ माय वाइफ़ एलिया..." संगणकाच्या पडद्यावरील आपल्या नि आपल्या सौभाग्यवतींच्या, ग्रीसच्या कुठल्याशा समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुटीतील, 'स्क्रीनसेव्हर' म्हणून अवतरलेल्या एका फ़ोटोकडे निर्देश करून ते म्हणाले.
"ही आमची कवळ्याची शांतादुर्गा. हे माझे आईबाबा. आणि ही माझी गर्ल..फ़्रें....." 'सांगू का मी पण सांगू' या आवेशात पण मनातल्या मनातच मीही.
म्हणजे आता पुढच्या सत्रापर्यंत थांबायचे? तोवर एखादी कामचलाऊ नोकरी करणे आलेच. नोकरी, अभ्यास सांभाळून यांचे काम करायचे म्हणजे मी लवकरच निजधामाच्या वाटेवर निघणार, हे मला डोळ्यांसमोर दिसू लागले.
"वुड यू लाइक टु हॅव सम फ़्राइज़? लेट अस गो फ़ॉर लंच इफ़ यू आर नॉट डुइंग एनिथिंग ग्रेट" महाशय खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी उदार दिसतायत. पण आज़च्या संकष्टीच्या दिवशी यांच्याकडे साबुदाणा खिचडीची मागणी कशी करायची? बरे पहिल्याच भेटीत कॉफ़ी किंवा सरबत तरी कसे मागायचे? माझा भिडस्तपणा असा नको तिथे नडतो! शेवटी कशीबशी उरलीसुरली भेट संपवून बाहेर पडलो. इतर दोन प्राध्यापकांकडूनही ज़वळपास सारखीच उत्तरे मिळाली. कोणाकडेच बिनपगारी काम न करता मी गपगुमान माझे स्वतःचे काम करायला सुरुवात केली.
माझ्याचसारखे अनुभव इतर काही मित्रांनाही आले होतेच. अशाच एका संध्याकाळी घराबाहेरच्या कट्ट्यावर अड्डा ज़मला असताना सगळ्यांनी आपापले अनुभव वाटून घेतले.
"अरे वो बंदा बोला उसको सी प्लस प्लस मे कोड करनेवालाही कोई चाहिये"
"क्या बात कर रहा है! मुझे तो बोला प्रॉजेक्ट मे सी प्लस प्लस की कोई ज़रूरत है ही नही वैसे. अजीब आदमी है यार!"
"मैने तो सोचा था उसके लिये वो गणेशजी की छोटीवाली मूर्ती और एक बॉक्स आग्रे का पेठा लेके जाउंगा. पर भूल गया..."
"अबे तू प्रॉफ़ के पास जानेवाला था की मंदिर में? पागल हो गया है क्या तू?"
अशी कित्येक सुखदु:खं मी पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या दोनेक महिन्यात बऱ्याचदा ऐकली होती.
अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्रात मात्र एका भारतीय प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र संशोधन करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच ऍडवायज़र या व्यक्तिरेखेशी ज़रा ज़वळून संबंध आला.

Friday, March 02, 2007

बायको


'बायको' या शब्दाशी ओळख पहिल्यांदाच झाली, ती परीकथांमधून. राजाची 'बायको' म्हणजे राणी; वाघीण किंवा सिंहीण ही सुद्धा अनुक्रमे वाघाची नि सिंहाची 'बायको'च असायची. अगदी रामायण-महाभारतापासून ते अलीकडच्या परीकथांपर्यंत सगळीकडे राक्षससुद्धा कोणाला पळवायचे असले, की नेमका 'बायको'लाच पळवायचा. त्यामुळे 'बायको' ही जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे, अशी बालमनाची पक्की समज़ूत झालेली. परिणामी, "यावर्षी वाढदिवसाला काय घ्यायचं बंड्याला?", असं आजीने विचारलं की मीही बिनधास्त "आजी, आपण मला बायको घेऊया का?" म्हणत असे. मुंजीच्या वेळी मामालाच "मुलगी बायको म्हणून दे नाहीतर चाललो काशीला!", असे धमकावून सांगायची संधी मिळाली खरी, पण माझ्या परमप्रिय प्रतापी मामेबहिणीकडून बार्बी, मोटारगाड्या आणि भातुकलीवरून गालावर उमटवून घेतलेली बोटं आणि ओरखडे (वेळीच!) आठवले आणि 'काशी नको, पण ही महामाया आवर' स्थितीत मामाही स्वस्तात सुटला. अशा 'बायको'ला राक्षस का नि कसा पळवतो, याचं राहून राहून आश्चर्य वाटायचं.
परीकथांचे दिवस संपले आणि बायको ही संकल्पनाही हळूहळू बदलत गेली. एक पळवायची गोष्ट या स्थानावरून 'बायको'ला बढती मिळाली आणि ती उटीच्या बॉटनिकल गार्डनवरच्या उतरत्या हिरवळीवरून सलमान खानबरोबर लोळत येणारी 'मैंने प्यार किया' मधली भाग्यश्री पटवर्धन (पटवर्धन!), 'कयामत से कयामत तक' मधल्या आमीर खानला मागून धावत येऊन मिठी मारणारी जुही चावला किंवा झालंच तर ज्याचं नावही आज़ आठवत नाही अशा तद्दन टुकार चित्रपटातली, मिथुन चक्रवर्तीने झोपेतच हात पकडला म्हणून (आनंदाने!!!) दचकलेली रती अग्निहोत्री, अशा निरनिराळ्या (हव्याहव्याशा!) रुपात समोर यायला लागली. 'हम आपके हैं कौन' मधली सोज्वळ माधुरी हीच बायको आणि 'सबसे बडा खिलाडी' मध्ये कितीतरी मादकपणे 'भरो, मांग मेरी भरो' गाणारी ममता कुलकर्णी (कुलकर्णी!!) ही ('मांग मेरी भरो' म्हणाल्याने कितीही वाटली तरी) बायको नाहीच, हे सुद्धा व्यवस्थित समज़ायला लागलं. शाळेतलं आपलं पहिलं क्रश म्हणजेच आपली बायको, या समज़ुतीतून मग कविताबिविता लिहिणं, तिच्याचसाठी मधल्या सुटीत मैदानात भटकणं, ती शाळेत यायच्याआधी नि शाळा सुटल्यावर तिच्या बसस्टॉपवर घुटमळणं असली मजनुगिरी; आणि याचंच थोडं 'ज़ाणकार'(!) रूप म्हणजे कॉलेजात साज़रे केलेले व्हॅलेंटाइन डेज़, रोझ डेज़, भेट म्हणून दिलेली चॉकलेटं वगैरे सगळं. बहुभार्याप्रतिबंधक कायदा वगैरे गोष्टींच्या अस्तित्त्वाचीही ज़ाणीव नसल्याने या सगळ्या गोष्टी केवळ एकाच मुलीपुरत्या मर्यादित न ठेवता आज़वर 'बायको'साठी म्हणून निश्चित केलेल्या निकषांवर खरी उतरणारी किंवा उतरवली ज़ाणारी कुणीही मुलगी लैलाच्या भूमिकेत चपखल बसायला लागली आणि आयुष्यातलं बायकोचं स्थान पटकावायला कित्येक पर्याय उपलब्ध झाले.
तेही वय मागे पडल्यानंतर मात्र मित्रमैत्रिणींसोबत दंगामस्ती नि उनाडक्या करण्याबरोबरच बायको 'कशी' हवी, 'का' हवी अशा अनेक प्रश्नांवर 'गंभीर' या प्रकारात मोडणाऱ्या चर्चा होऊ लागल्या. 'दिल चाहता है' मध्ये 'जो खुद जिये और मुझे जिने दे, ज़्यादा इमोशनल-विमोशनल ना हो' म्हणून आमीर खानने 'बायको'ला आणखी एक 'डायमेन्शन' ('मिती' हा काय बोअर शब्द आहे!) दिलं. सासूसुनांच्या मालिकांमधून स्मृती मल्होत्रा ज़शी बायको असू शकते, तशीच सुप्रिया पिळगावकरही बायको असू शकते, हे सुद्धा ज़ाणवलं. मग मला समज़ून घेणारी, माझ्या आवडीनिवडींशी बऱ्यापैकी मिळत्याज़ुळत्या आवडीनिवडी असणारी, मतमतांतरांचा आदर करणारी नि त्याबरोबरच स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करू शकणारी, सुखदु:खात साथ देणारी, उच्चशिक्षित नि नोकरी करणारी, माझ्या आईबाबांचा आदर असणारी पण तरीही बऱ्यापैकी 'मॉड' (म्हणजे काय ते अज़ून माहीत नाही!) वगैरे वगैरे 'स्टिरिओटिपिकल' अपेक्षा असणं ओघाओघाने आलंच. माझ्या मित्रमंडळींपैकी अनेकांनी तर पदवीधर झाल्याझाल्या आपापली 'प्रकरणं' रीतसर 'अप्रूव्ह'ही करून घेतली. मायदेशापासून हज़ारो मैल दूरवर आमच्या इनबॉक्समध्ये चक्क मित्रमैत्रिणींच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिका येऊन पडू लागल्या! नको त्या वेळी आपल्यालाही या दिव्यातून कधी तरी ज़ावं लागेल, अशी भयानक ज़ाणीवही झाली. पण त्याचबरोबर 'मुलगा गझलाबिझला, कविता लिहितो म्हणे', 'पुढे आणखी शिकायचं म्हणतोय हो, बघा बुवा काय ते!', झालंच तर 'बाकी सगळं ठीक आहे, पण तसं बऱ्यापैकी दिसण्याइतकं (!) पोट आहे (?!)' असे (अगदी आमच्या खात्यापित्या घराण्यावर ज़ाणारे!) अनेक शेरेही मिळणारच, याची खात्री झाली, की लगोलग सुरक्षिततेची भावनाही निर्माण व्हायची. बायको हे किती अजब रसायन आहे, हे आज़वर इतरांच्या अनुभवांवरून, बोलण्यावरून, (अगदी प्रसाद शिरगावकरांच्या 'बायको नावाचं वादळ' सारख्या भन्नाट साहित्यकृतींवरूनसुद्धा) लक्षात आलंच होतं. म्हणजे उद्या मी (ज़र!) गज़रा घेऊन आलो(च!), तर तो माळून मला स्वतःबरोबर मटार सोलायला बसवणारी बायको आवडेल, की नाटकाला ज़ाऊया म्हटल्यावर "डार्लिंग, किटी पार्टीला ज़ाऊया का आज़चा दिवस?" विचारणारी बायको आवडेल, हे ज़ोवर ठरवता येत नाही, हॉटेलात जेवल्यावर माझ्याच ग्लासातून रोझ मिल्कशेक पिणारी बायको हवी की शँपेनचा ग्लास उंचावून 'चिअर्स' करणारी बायको हवी, हे ठरवता येत नाही (म्हणजे 'विच ऑफ़ द टु इज़ (मोअर?) बेअरेबल, हे ठरवता येत नाही! ऍक्सेप्टेबल काय आहे, हा वेगळाच मुद्दा आहे), थोडक्यात तोवर आपण 'सेफ़' आहोत, ही ज़ाणीवच सुखावह वाटते. आपण म्हणावं की "मला झोप येते आहे गं बाई!", आणि बायकोने म्हणावं "नाटकं करू नकोस जास्त, ज़रा पिल्लूचा युनिफ़ॉर्म कपाटातून काढून हँगरला लावून ठेव उद्यासाठी"; रविवारी दुपारी मस्तपैकी सोलकढी-भात नि फ़्राय पापलेटच्या जेवणानंतर चटईवर पडल्यापडल्या आपण तिच्या अंगावर हात टाकावा आणि उतू गेलेल्या दुधाच्या वासानं तिने दचकून स्वयंपाकघरात धाव घ्यावी; लग्नाआधी "आज़ संध्याकाळी कुठेतरी ज़ाऊया का"वर मी चालू केलेला फोन तास-दीड तासाने "चल बॉस आला, मी ठेवते" वर संपवणाऱ्या बायकोनेच, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी घेतलेली साडी बोहारणीला द्यायचे दिवस आले की मात्र गाडीवरची गवार घेताना "आठ रुपे में देनेका है तो बोल" म्हणताना दाखवलेले व्यवहारचातुर्य दाखवावे, आणि प्रसंगी तिनेच घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय, म्हणून हॉटेलात घेऊन ज़ावं; पोराबरोबर क्रिकेटची मॅच बघताना बायकोने मस्तपैकी भजी तळावी, तीही इंडियाच्या टीमचा नि आम्हां बापलेकांचा उद्धार करतच, आणि इतकंच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याची विकेट पडल्यावर आमच्या जल्लोषात तिनेही सामील व्हावं; अशा अनेकानेक 'माफ़क' अपेक्षा पूर्ण करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बायको, ही व्याख्या सर्वमान्य आहे की नाही, फ़ारच आदर्शवादी आहे की वास्तववादी वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत, तोवर निवांत असे पानभर लेख खरडण्यास आपण पूर्ण मोकळे असतो, हे लक्षात ठेवावे नि वेळेचा असा सदुपयोग करावा.
मुंबई विद्यापिठाच्या अभियांत्रिकीच्या एखाद्या पेपरात उपटलेला अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्नसुद्धा सुसह्य ठरावा, असे हे यक्षप्रश्न ज्या परीक्षेत येतात, त्या परीक्षेत केट्या घेत पुढे ज़ाण्यापेक्षा (बरे, महत्त्वाचा मुद्दा असा की तशा त्या कधी क्लिअरसुद्धा करता येत नाहीत ) विषय फ़र्स्ट अटेंप्टच क्लिअर करावा किंवा ज्ञानशाखाच बदलून घ्यावी, अशा टोकाच्या भूमिकेचाही विचार 'मार्केट'मध्ये येऊ घातलेल्या तरुणांच्या डोक्यात घोळल्यास नवल ते काय! पण तरीही आमच्याच एका बंधुराजांकडून त्यांच्या स्वतःच्या साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा "अगर शादी ऐसा लड्डू है, जो खाए वो पछताए, जो ना खाए, वो भी पछताए, तो बेटर है की खाकेही पछताओ", हे ऐकले त्यावेळी मात्र 'बायको'वर गेले दोन तास इतके मोठे पारायण खरडले, ते खरडण्याचे मला त्यावेळी कसे काय सुचले नाही, असे वाटून गेले आणि त्याचवेळी कोणत्याही विषयावर टोकाची भूमिका घेऊन चालत नाही, हे पटले. 'बायको'सारख्या नाज़ूक पण तरीही ज्वलंत विषयावर तर नाहीच!

Wednesday, February 14, 2007

या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता



गेल्या शनिवारी आमच्या विद्यापिठात हिंदू विद्यार्थी संघटनेतर्फ़े सरस्वती पूजेचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला याआधी कधीच हजेरी लावली नव्हती आणि जूनपासून सॅन होज़ेला गेल्यानंतर रालेला कधी परत यायला मिळेल आणि असे कार्यक्रम, संमेलने यांत सहभागी होता येईल की नाही, ते सांगता येत नाही. त्यामुळे यावर्षी सरस्वती पूजेला हजेरी लावायचे नक्की केले.
विद्यापिठाच्या ज़ुन्या आवारातील (ज्याला आता ऐतिहासिक आवार(historical campus) संबोधले ज़ाते) मॅन सभागृहात आटोपशीरपणे हा सोहळा रंगला होता. देवी सरस्वतीची अतिशय प्रसन्न करणारी मूर्ती, आज़ूबाज़ूची साधीच पण तरीही नज़रेत भरणारी कल्पक सज़ावट आणि सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह यांमुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती. सरस्वतीचे पूजन, मंत्रपठण नि आरती आणि त्यानंतरचे प्रसादभक्षण अशा छोटेखानी कार्यक्रमात संध्याकाळचे चार-एक तास कसे निघून गेले कळलं सुद्धा नाही. पण या सगळ्या वेळेच्या सदुपयोगाचं प्रयोजन असलेल्या सरस्वतीच्या चेहर्‍यावरची कोणालाच न दिसलेली अनेक प्रश्न घरी आल्यावर चहा घेतानाही मला अस्वस्थ करत होती.
सर्व प्राणिमात्रांमध्ये विद्येच्या रूपाने वास करणार्‍या या देवीची आराधना केवळ मंत्र नि आरत्यांपुरतीच मर्यादित का म्हणून रहावी? आज़ मी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय; पण माझ्या भारतातच असे किती ज़ण आहेत की ज्यांना शिक्षणापासून वंचित रहायला लागतंय? गावागावांमध्ये आज़ही शिक्षणाबद्दल उदासीनता आहेच. सरकारने अनेक योजना चालू केल्या आहेत, हे खरं. मुलींसाठी मोफ़त शिक्षण, सर्वत्र मोफ़त प्राथमिक शिक्षण, अनेक सवलती नि आरक्षणे अशा कित्येक मार्गांनी सरकार शिक्षणाचा प्रचार नि प्रसार करायचे प्रयत्न करते आहे, हे आम्ही नाकारत नाही. शाळांना मिळणारी अनुदाने, भूखंड किंवा इतर प्रकारची मदत, दूरदर्शनवरील 'स्कूल चले हम', 'पूरब से सूर्य उगा', अशा एकापेक्षा एक सरस जाहिरातींद्वारे केला ज़ाणारा शिक्षणप्रचार यांचंही महत्त्व आम्हांला कळते. पण यापलीकडे ज़ाऊन सरकार ग्रामीण भागात जागृती निर्माण करण्यासाठी काय़ करते आहे, हे आम्हांला कळत नाही. ग्रामपंचायतीच्या सभांमधून आम्हांला शिक्षणाच्या योजना नि साधने यांबाबत माहिती मिळण्य़ापेक्षा किंवा ती मिळवण्यापेक्षा शेतज़मिनीवरून होणारी भांडणे, गावातील भाऊबंदकी आणि पंचायतीतील राजकारण यांत जास्त रस असतो. शिक्षणासाठी मिळालेली सरकारी मदत शाळेची इमारत उभारण्यात खर्च झाली की सरपंचाच्या घरची दारू आणण्यात, हे कळत नाही; आणि त्याबाबत विचारणा करण्याइतके सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय जागरुकता यांपैकी कसलाच आवाज़ आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे आम्ही आवाज़ काढायचा म्हटला तरी तो ऐकला ज़ाण्यापूर्वीच विरून ज़ायची शक्यता अधिक.
आणि असा आवाज़ उठवण्यापूर्वी हे सुद्धा पहायला नको का की आमच्या गावांमधले किती आईबाबा त्यांच्या मुलांना - खास करून मुलींना - शाळेत पाठवतात? किती मुले सातवी किंवा दहावीच्याही पलीकडे ज़ाऊन शिकतात? जी मुले शिकत नाहीत, त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्याची सोय आहे का? नसते काही ज़णांना शिकायची आवड. काही ज़णांना प्रयत्न करूनही गणित, शास्त्र, भाषा इत्यादी विषयांच्या अभ्यासात, शिक्षणात गोडी निर्माण होत नाही. कबूल आहे आम्हांला हे. पण मग अशी अशिक्षित मनुष्यसंपत्ती आम्ही व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन समाजोपयोगी कार्यासाठी अधिक सक्षम केली तरी चालू शकेल नाही का? त्यादृष्टीने आमच्याकडे काय योजना आहेत? त्याबाबत किती माहिती उपलब्ध आहे नि किती जागरुकता आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर आवश्यक आहे स्वकृती आणि माहितीचा अधिकार. सध्याचं चित्र अधिक प्रसन्न, आश्वासक, आशादायी बनवायची ज़बाबदारी माझी स्वत:ची आहे, ही ज़ाणीव प्रत्येकालाच असणं महत्त्वाचं आहे. स्वहिताच्या नि आत्मसमाधानाच्या संकुचित चष्म्यातून दिसणारं जग हे बरंच काही न दिसल्याचंच चिन्ह आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण नि आपल्याबरोबरच आपल्या येणार्‍या पिढ्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेणं आणि इतरांना ते घेण्यासाठी उद्युक्त करणं महत्त्वाचं आहे. समाजात सध्या चांगल्या शिक्षकांची कमी आहे. त्यामुळे सामाजिक जागरुकता प्रभावीपणे निर्माण होत नाही, याचं दु:ख आहेच; पण त्याबरोबरच दुसरं दु:ख आहे ते शिक्षकी पेशाला चिकटलेल्या बाज़ारीकरणाचं. "आयुष्याच्या उत्तरार्धात मला प्राध्यापक म्हणून काम करायला आवडेल", असं मी एकदा म्हटलं होतं. त्यावेळी ज़मलेल्या मंडळींकडून केला गेलेला उपहास या पेशाबद्दल असलेली सर्वदूर उदासीनताच दर्शवतो. आणि हे असंच चालत राहिलं तर सध्यच्या परिस्थितीत सुधारणा होण्याबाबत फ़ारसं आशावादी न राहिलेलंच श्रेयस्कर.


  1. परिस्थिती बदलली पाहिज़े, अशी बोंब न मारत बसता ती बदलण्यासाठी स्वत: काहीतरी करा.

  2. शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करणं, केवळ आर्थिक मदतच नव्हे तर प्रत्यक्ष सहभागातून हे कार्य साधणं, याचं महत्त्व इतर कशापेक्षाही जास्तच आहे. शाळासाठी नुसत्या देणग्या देऊ नकात, तर शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुज़ू व्हा किंवा आपल्या घरीच गरज़ू विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घ्या. त्यासाठी योग्य तो मोबदला घ्या, पण विद्यार्थ्याच्या आर्थिक पार्श्वभूमीचा यथायोग्य विचार करून, पटल्यास नि गरज़ पडल्यास त्यांना मोफ़त शिकवण्यासाठी मागेपुढे पाहू नकात.

  3. सरकारी शैक्षणिक योजनांचा प्रचार करा. सरकारकडून योग्य ती माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करा नि या अधिकाराबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करा. जनता नि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करता येत असेल, तर नि:संकोच नि नि:स्वार्थीपणे तसे करा.

  4. शास्त्रोक्त नि पारंपारीक शिक्षणात रस नसलेल्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, ते पहा.

या आणि अशा अनेक गोष्टी केल्या तर धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्षाला चार लाख रुपये भरणारा विद्यार्थी नि गडचिरोलीच्या कुठल्याशा पाड्यामधला कधीही शाळेत न गेलेला बालमज़ूर असं टोकाचं निराशावादी चित्र दिसणार नाही. विद्यार्थीदशेत असताना यातल्या सगळ्याच गोष्टी करता येणं शक्य नसेलही, पण जितक्या ज़मत असतील, त्या करायला तरी आपण मागेपुढे पाहू नये.


पाहूया तर प्रयत्न करून. सरस्वतीच्या चेहर्‍यावरची अनेक प्रश्नचिन्ह कदाचित आपल्याला पुसता येतील.